Sunday 15 December 2013

लक्षात राहिलेला . . लक्ष्या !!

आयुष्यातल्या जिंदगीत कधी महेश कोठारे यांच्याशी 'ग्रेट भेट ' झाली तर त्यांना एक प्रश्न विचारणार आहे . महेश सर तुम्हाला कधी 'महेश महेश ' अशी हाक मारून बोलावतंय असा भास होतो का हो ?? याचे उत्तर कदाचित होयच असेल . . . याच 'महेश ' ने अन नेहमी अडचणीत सापडणाऱ्या लक्षाने आम्हाला हसायला शिकवले . . आज लक्षाचा स्मृतीदिवस . . अगदी विस्मृतीत गेलेला . 'अरे यार ,आज लक्षा असता तर . . . ' असे म्हणत अनेक कट्टे भावनांनी अन आठवणीनी ओलसर केले . त्याचेच संवाद कसेबसे त्याच्याच स्टाइलने फेकायचे केविलवाणे प्रयत्न करत हास्याचे कारंजे उडवले . तो बनवाबनवी करत असताना स्वतःला बनवून घेतले . तात्या विंचू म्हणजेच तो गोष्टीतला बागुलबुवा समजून लहान वयात माहित असलेल्या सगळ्या देवांचे स्मरण केले . . पण तो आपल्यातून कधी गेला हा दिवस मात्र सपशेल विसरलो . . हा दिवस रंगभूमीला अन चित्रपटसृष्टीला आठवणीत असेल पण प्रेक्षकांना आठवण करून दिली तरी पटणार नाही . . कारण लक्षा गेलाय हे कोणाला पटणारच नाही . . तो इथेच कुठेतरी आहे . . जवळपास . . अजूनही हसवतोय . . चौकोनी चेहेरे हलवतोय . . चेहेऱ्यावर रंग लाऊन आयुष्याचे रंग बदलतोय . . तो जाणे शक्यच नाही . . याच 'भावनेला अन भासाला ' आज ९ वर्षे पूर्ण झाली . . . 

Saturday 14 December 2013

भय इथले संपत नाही

Now, should we treat women as independent agents, responsible for themselves? Of course. But being responsible has nothing to do with being raped. Women don’t get raped because they were drinking or took drugs. Women do not get raped because they weren’t careful enough. Women get raped because someone raped them.
Jessica Valenti

काही घटना या केवळ घटना नसतात . तर त्या जखमा असतात . एखाद्या व्यक्तीच्या शरीरावर अन संपूर्ण समाजाच्या मानसिकतेवर , दांभिकतेवर , नैतिकतेवर अन मुल्यांवर पडलेल्या . . . जखमा !! कालांतराने या जखमांचीही प्रतीके होतात , अस्मिता जन्माला येतात , भगभगणाऱ्या वेदना अन ठसठसणाऱ्या संवेदना शांत होतात . . व्यक्ती सावरते . . समाज विसरतो . . पण या जखमांची सुद्धा एक वेगळीच वेदना असते . . ज्या दिवशी त्या घडल्या त्याच दिवशी लोकांना अचानक स्मरण होते . . " अरे बरोबर अमुक वर्षापूर्वी तमुक घडले होते '' पुनश्च आठवणी ताज्या होतात . 'त्या ' दिवसापासून ते 'या ' दिवसापर्यंत काय घडले याचा वार्षिक आढावा घेण्यात येतो . इतर देशांपेक्षा भारत किती उदासीन आहे याबाबत चूकचूक पचपच होते . कालांतराने तीही नाहीशी होते . . हे असेच अनेक वर्षे सुरु आहे . . अव्याहत . . मग ती फाळणी असो , भारत -पाकिस्तान  भारत -चीन युद्धे असो , बाबरी मशीद असो , कारगिल युद्ध असो , संसद भवन हल्ला असो , २६ /११ चा दहशतवादी हल्ला असो वा . . . १६ डिसेंबर २०१२ असो . . . घटना घडल्यावर नजीकच्या भविष्य काळा बद्दल प्रत्येक भयभीत होतो . . कालांतराने आश्वस्त किंवा निर्भय होतो . . पण . . ' भय इथले संपत नाही ' . . येणारा प्रत्येक 'उद्या ' एका नवीन प्रश्नाला जन्म देतो . . नव्या जखमांसह समाजाला रुजा देतो , माणसातले माणूसपण खच्ची करतो अन समस्त मानवजातीला प्रश्न विचारतो . . 'मानसा मानसा कधी होशील रे माणूस ?''

Wednesday 4 December 2013

टाटा नॅनो ' प्रॉमिस इज प्रॉमिस '

कर्जाच्या गराड्यात अन हप्त्याच्या विळख्यात
माणसानं स्वप्न तरी कस बघाव ?
चार जणांच्या पोटाची जबाबदारी असलेल्यानं
संसाराच्या गाड्याला गाडीच चाक कसं जोडाव ?
''आज छोटी म्हणाली , बाबा उद्यापासून तुम्ही मला शाळेत सोडायला येऊ नका . तीला कमीपणा वाटतो . माझा अन आपल्या स्कूटरचा . . तिच्या मैत्रिणी गाडीतून येतात . चिडवतात तीला . एक 'साधी ' गाडी नाही म्हणून . साध्या माणसाकडे कशी असणार ग गाडी ?? दूरच्या शाळेत जाताना माझी पोरगी माझ्यापासून दूर जात आहे . . . '' भावनांनी ओलावलेल्या रात्रीला आश्रुनी चिंब करणारे शब्द प्रत्येकाने ऐकले , अनुभवले असतील . कधी स्वतःच्या घरात तर कधी शेजाऱ्याच्या . . कधी ट्रेन मध्ये शेजाऱ्या कडून तर कधी ऑफिस मधल्या सहकाऱ्या कडून . शब्दांची पेरण वेगळी असली तरी वास्तवाची दाहकता सारखीच असते . आपण 'गाडी ' घेऊ शकत नाही याचे दुक्खच वेगळे असते . अनेक प्रौढ सायकलच्या दांडीवर किंवा पेट्रोलच्या टाकीवर बसलेल्या पोरासोबत लहान होतात . समोरून चाललेल्या चकचकीत गाडीकडे हरखून बघतात . पोराची आणि पोरसवदा मनाची समजूत घालत रस्ता संपवू बघतात . अशी अनेक कुटुंबे , अनेक कुटुंब प्रमुख आहेत ज्यांना पद्मिनीच्या जमान्यापासून गाडी घ्यायची असते पण जमाना गेला तरी त्यांचे स्वप्न 'अबाधित ' असते . कधी बस मध्ये लोंबकळत , ट्रेन मध्ये लटकत , टमटम मध्ये कोंबत , टेक्सी मध्ये गुदमरत रोजचा प्रवास करत करत असतात . जीवासाठी . . जीव धोक्यात घालून . अशा अनेक लोंबकाळलेल्या , लटकलेल्या , कोंबलेल्या , गुदमरलेल्या आणि घुसमटलेल्या जीवांकडे लक्ष कोण देणार ? आताच्या 'संस्कृतीत ' काच बंद केली किंवा दरवाजा जोरात आपटला की सगळे प्रश्न 'आपल्यापुरते ' संपतात . . या संकुचित जगात असा एकतरी जीव असतो जो इतरांची घुसमट समजू शकतो . त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी झटणारा असतो . निराशेला आशेत आणि नाही रे ला आहे रे मध्ये बदलण्याची क्षमता राखून असतो . . गरज असते योग्य 'वेळ ' येण्याची .

Saturday 30 November 2013

तरुणांचा आदर्श कोण ??

वलयांकित क्षेत्र हे बहुदा कलंकीत 'च ' असते असे सर्वसामन्यांचे ठाम मत असते . त्यामुळे अशा क्षेत्रात आपली मुले -मुली स्वहस्ते पाठवायला तो अजूनही बिचकतो . . या वलयांकित क्षेत्राला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा सर्वतोपरी प्रयत्न करतो . . हा द्वेष बोलण्यातून सुद्धा जाणवतो . आमची ती संस्कृती त्यांचे 'कल्चर ' . आमची 'जीवनशैली ' आणि त्यांची 'लाईफ स्टाईल ' . आमची 'मुल्ये ' आणि त्यांचे 'मॉरल्स ' . इत्यादी . या वलयांकित क्षेत्रातील लोकांनाही खाजगी सुसंकृत आयुष्य असते असे मानायला पापभिरू कुटुंबे तयार नसतात . . या क्षेत्रात वर जाताना पैशा सोबत बरेच काही द्यायला लागते असा सार्वत्रिक गैरसमज असतो . सिनेमा अन बातम्या यामुळे तो अधिक बळकट होतो . या बरेच काही ला अनेक पर्याय आहेत . कुछ पाने के लिये कुछ 'खोना ' पडता है . इस हाथ से ले उस हाथ से 'दे ' . अजून बरेच काही . या सर्व शब्दांचा लसावी काय तर काहीतरी कमवत असताना काहीतरी '  गमवावे ' लागते . इथे काहीतरी गमावणारी 'स्त्री ' असेल तर तिचे काहीतरी गमावणे सामाजिक चिंतेचा अन चिंतनाचा विषय होतो . जेव्हा काहीतरी गमावलेली स्त्री जाहीरपणे म्हणते , ' आपण केवळ एकनिष्ठता अन आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे हे दाखवून देण्यासाठी लढत आहोत .' तेव्हा पत्रकारीतेसारख्या वलयांकित क्षेत्रामध्ये सतत प्रकाशझोतात वावरणाऱ्या , नैतिकतेचा अन सामाजिक मुल्यांचा झेंडा आपल्याच खांद्यावर आहे या अविर्भावात वावरणाऱ्या , त्या 'क्षेत्रात ' येऊ पाहणाऱ्या काही शे मुला मुलींच्या 'आदर्श ' असलेल्या व्यक्तींची कलंकित मानसिकता देशासमोर येते अन प्रश्न उभा राहतो  तरुणांचा आदर्श कोण ??

Saturday 23 November 2013

नामांतर - एक वाद . . एक संधी !

'नावात काय आहे ? ' असा सवाल निर्माण करून थोर नाटककार शेक्सपिअर सोळाव्या शतकात निवर्तला . तोच जर विसाव्या शतकात अन त्यातल्या त्यात भारतात जन्माला आला असता अन नावात काय आहे ? असे काहीबाही बोलता झाला असता , तर निश्चित 'प्रतिगामी ' ठरवला गेला असता . चौका चौकात त्याच्या नावाने शिमगा झाला असता , त्याचेच साहित्य जाळून त्या भोवती सुधारणावादी पुरोगामी कार्यकर्त्यांनी फेर धरला असता , शाई आणि डांबराच्या रंगात तो न्हावून निघाला असता . तो तिकडेच महान म्हणून (होऊन ) गेला ते बरे झाले . . भारतापुरता विचार करावयाचा झाला तर नावात काय नसते ?? नावात वर्ण ,वर्ग , वलय , वर्चस्व , जात ,धर्म  , राग ,द्वेष , अनुनय ,असूये पासून अस्मिते पर्यंत सर्वकाही असते . म्हणूनच भारतीय 'नावावर ' चालतो , विकतो अन खपतो सुद्धा . . याच नावाला एकदा आडनाव चिटकले की आडमार्गाने वेगळेच राजकारण सुरु होते . आमचे अन तुमचे या भांडणात ते 'आपलेच ' आहेत हा विस्तृत दृष्टीकोन संकुचित होतो . अमुक एक नावा आडनावाची व्यक्ती म्हणजे तमुक जातीची /धर्माची अस्मिता . . इतरांना त्यावर बोलायचा किंवा तात्विक विरोध करायचा अधिकार नाही . . कारण . . कार्याला अडगळीत टाकून केवळ नावाचे भांडवल करणे , अस्मितेचा मुद्दा बनवून समाजाला एकमेकात झुंजवणे , व्यक्तीची प्रतीके बनवून त्यांचे अमर्याद कार्य ठराविक जाती धर्माच्या 'मर्यादित ' चौकटीत बंदिस्त करणे अन त्या बंदिस्त चौकटीचा एकमेव रखवालदार , वारसदार म्हणून बहुसंखेने समाजात वावरणे किंबहुना समाजात आपल्यासारख्याच संकुचित विचारसरणीच्या लोकांचा समूह तयार करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे हेच या शतकाचे ' नामी ' राजकारण आहे . . . .

Monday 18 November 2013

'नकळत दिसले सारे . . . '


ती एक प्रशांत सायंकाळ होती . घड्याळात किती वाजले होते आठवत नाही . कारण डोळे निकामी झाले होते . कान दुप्पट वेगाने कार्यरत झाले होते .. समोरून कोणीतरी येतंय , बाजूने कोणीतरी सरकतंय , मागून कोणीतरी ढकलतय , पुढून कोणीतरी ओरडतय हे सारे जाणवत होते पण दिसत नवते . . . मी अंधळा झालो होतो का ?? डोळ्यासमोर केवळ अंधार . . ओळखीचा रंग एकच . . सोबतीचा रंग एकच . . ज्ञात असलेला रंग एकच . . 'काळा ' . . कधीपासून होतंय मला असे ?? समोरचे दिसूनही दिसत नाही , असूनही जाणवत नाही , बघूनही बघवत नाही . . . का ?? माझी दृष्टी गेली होती का डोळसपणा हरपला होता ? मी माझ्या आयुष्याकडे शेवटी कधी 'डोळसपणे ' डोकावून पहिले होते ? माझे आजपर्यंतचे आयुष्य कधी 'डोळ्याखालून ' घातले होते ? मला सुंदर डोळे दिल्या बद्दल मी ईश्वराचे कधी आभार मानले होते ? ज्यांना डोळे नाहीत त्यांना मी कधी मदत केली होती ? डोळे मिटण्या पूर्वी जर डोळेच काम करेनासे झाले तर आयुष्य कसे असेल याचा मी कधी विचार केला होता ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर म्हणजे भावनांना हात घालून सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारे नाटक ' नकळत सारे दिसले . . . '

Friday 15 November 2013

तें . . .

समस्त महाराष्ट्राने ' तें ' वर मनापासून प्रेम केलं . त्यांना आपलंसं मानलं . 'तें ' च्या वेगळेपणाला स्वीकारलं . कारण 'तें ' म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे . तर ती एक मानसिकता आहे . एक जीवनशैली आहे . प्रस्थापित शक्ती , समजुती , भाकडकथा यांना हादरवून टाकणारी ताकद आहे . इतिहासात न रमता इतिहास निर्माण करण्याची जिद्द आहे . वर्तमानाला न चुचकारता भविष्याला आव्हान देण्याची धमक आहे . समाजात वावरताना सामाजिक नैराश्या विरोधात केलेला विद्रोह आहे . मोठ्ठ होत असताना मोठेपणातील फोलपणा ओळखून जमिनीशी नातं टिकवून धरण्याचा मोठेपणा आहे . वैयक्तिक आयुष्यातील दुक्खे मागे सारून समाजाला , देशाला पुढे नेण्याचे नेतृत्व आहे . मागाहून येणाऱ्या अनेक पिढ्यांवर गारुड राहावं अस कर्तुत्व आहे . उंचीवर जाऊन देखील खोलीतला खोलपणा जाणण्यातलं अन मानण्यातलं तत्व आहे . पराकोटीचे प्रेम अन टोकाचा विरोध एकाचवेळी मिरवण्याचे निष्काम कर्मयोग्याचे 'तें ' चे जीवन आहे . . . . 'तें ' . . मग ते विजय असो वा सचिन . . . क्षेत्र भिन्न पण कार्य एकच . साधने वेगळी पण साधना एकच . . . दिशा वेगळ्या पण अंतिम क्षितीज एकच . . फटकारे वेगळे पण भिरकावणे एकच . . . व्यक्ती वेगळ्या पण आत्मा एकच . . महतीचे पोवाडे अनेक पण महानता स्पष्ट करण्यास पुरेसा शब्द एकच . . ' तें ' . . . !!
                                या दोन्ही तेंडुलकरांनी जोरदार अन जोमदार कलात्मक फलंदाजी केली . . . यांनी रचलेला प्रत्येक शब्द आणि मारलेला प्रत्येक फटका येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरला . बागुलबुवा करून महत्व दिलेल्या गोष्टीना सीमापार भिरकावून द्यायची शक्ती यांनी दिली . यांची अदाकारी म्हणजे समोरच्याला कोड्यात टाकणारी , कोडे सोडवच म्हणून मजबूर करणारी , कमाल स्वगत घडवून आणणारी अन अंती कमालीचा आनंद देणारी . मला तेंडूलकर समजले असा कोणीही सखाराम गटणे म्हणण्याचे धाडस करणार नाही अन मला तेंडूलकरचे तंत्र समजले असे निवृत्ती नंतरही म्हणायचे धाडस कोणी गोलंदाज करणार नाही . . या दोनीही ' तें ' नी गूढता जपली . सूर्यप्रकाशात सर्व गोष्टी सुर्यप्रकाशासारख्या स्वच्छ दाखवूनही बरेच काही आकलनासाठी शिल्लक ठेवले . आपली ओळख निर्माण करत असताना आपल्या क्षेत्राला सुद्धा मोठे केले . . या दोन्ही तेंडुलकरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'माणूस ' म्हणून प्रचंड मोठे अन समृद्ध झाले . आपापल्या क्षेत्रात चिरफाड करत असताना , वैयक्तिक आयुष्यात मात्र एक सभ्यता आणि पावित्र्य जपले .  विजय तेंडूलकर मलाही आताशी जरा कोठे समजायला लागले आहेत . सचिन बऱ्यापैकी समजला आहे . आजचा दिवस आणि येणारे काही दिवस सचिनचे असल्याने त्यावर थोडे अधिक भाष्य करतो . . 
                                 
भारतीय क्रिकेट मध्ये आपण चेंडू पर्यंत जायचे नाही तर चेंडूला आपल्या पर्यंत येऊ द्यायचे असा प्रघात असल्याचे काही मुलाखतीतून मला समजले . गोलंदाजाला अवास्तव महत्व देण्याचा हा प्रकार होता . 'पुढे सरसावून आघात ' करायची वेस्ट इंडिअन खुनशी मानसिकता आपण दूरच ठेवली होती . त्याचमुळे विशीच्या आतल्या एका पोराने अब्दुल कादिर ला पुढे सरसावून खणखणीत चार षटकार मारले तेव्हा भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलत असल्याचे अनेकांना जाणवले . भारत परदेशात जिंकू शकत नाही हा इतिहास कोठेतरी बदलायला लागला . गोळी सारख्या तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूला हतबलतेने पाहणारे गोरे सर्रास दिसू लागले . सुनील गावस्कर वगिरे यांनी याचा शुभारंभ केला होताच पण दूरदर्शन बाळबोध अवस्थेत असल्याने त्याचे दर्शन म्हणावे तितके झाले नाही . सचिन आल्यावर त्याने गोलंदाजांची जी कत्तल सुरु केली ती घरोघरी पोहोचली . आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला एक वेगळाच अनुभव देतोय याचा आनंद देशभर पसरायला लागला . प्रस्थापीत , नावाजलेली , दहशतनिर्माण केलेली ओस्त्रेलिया , पाकिस्तान , विंडीज यांची गोलंदाजी बेदरकारपणे फोडून काढता येते याचे प्रात्यक्षिक सचिन च्या रुपात पहायला मिळाले . अर्थात त्याच्या सहकार्यांनी सुद्धा गिअर चेंज केल्याने भारतीय क्रिकेट अन भारतीय प्रेक्षक यांची मानसिकता एकाच वेळी बदलायला लागली . सत्तांतराची  सुरुवात झाली . . याचा शिलेदार म्हणजे 'तें ' डूलकर . . . 
                         
   गेली पंचवीस वर्षे सचिन खेळत आहे . रोज काहीतरी शिकत आहे . कोणालातरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे शिकवत आहे . मोठेपणासोबत येणारी प्रसिद्धी आपल्या सहजतेवर मात करणार नाही याची दक्षता घेत 'तें ' प्रमाणे वाटचाल करत आहे . असामान्य गुणवत्तेला शालिनतेची जोड देऊन सभ्यतेचे नवे पायंडे पाडत आहे . विजय तेंडूलकर गेल्यावर साहित्य विश्वात जी पोकळी निर्माण झाली तीच पोकळी सचिन निवृत्त झाल्यावर क्रिकेट विश्वात निर्माण होणार आहे . कारण सचिन सोबत  'तें ' ची मानसिकता असलेल्या  , संस्कार असलेल्या  , जीवनशैली असलेल्या अनेक पिढ्या एकाच वेळी निवृत्त होतील . . अनुकरण करणारे अनेक 'तें ' जन्माला येतील किंवा घातले जातील . काही काळाने त्यांचाही उबग येउन मूळ 'तें ' ची गरज , साधना , आराधना पुन्हा एकदा अधोरेखित होईल . कारण तो , ती , ते अनेक जन्माला येतात पण 'तें ' . . . . . ?? क्वचितच जन्माला येतात . . .  जन्माला आल्याचे सार्थक करून शांतपणे निघून जातात . . . आपल्याला अस्वस्थ करून . . !! 

Wednesday 6 November 2013

उरले केवळ चार डाव !

सचिन च्या निवृत्तीची घोषणा ऐकल्यावर मी अस्वस्थ झालो . जसा जसा तो क्षण जवळ येत आहे तसा मी बेचैन होत आहे . माझे ,आपले कोणीतरी निवृत्त होत आहे असे वाटतंय . मन जुन्या दिवसात ,जुन्या आठवणीत रामतंय . मला शाळेतले दिवस अजूनही आठवतात . 'आई निवृत्त झाल्यावर /सुट्टीवर गेल्यावर ' काय होईल ? हा निबंध मी आईकडूनच लिहून घ्यायचो . माझा आवडता खेळ /खेळाडू यावर पटकन छानसा निबंध लिहून टाकायचो . कारण त्यावेळी आई मला कळली  नवती पण क्रिकेट आणि सचिन मला समजला होता . . लहानपणापासून मला मोठे करणाऱ्या , बाबांच्या अंगावर उड्या मारायला लावणाऱ्या , बहिणींशी पैजा लावायला लावणाऱ्या , अरे किती दंगा करतोस म्हणून आईचा मार खायला लावणाऱ्या सचिनच्या निवृत्तीला उरले केवळ चार डाव  . . . ! 

Tuesday 5 November 2013

मातीचा किल्ला : भाग तीन

अभिव्यक्ती म्हणजे काय ? अभिजात म्हणजे काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे ज्यांना हवी असतील त्यांनी मातीचा किल्ला पहावा . किल्ला हे   माणसाला समृद्ध करणारे , त्याच्या निरीक्षण आणि आकलन शक्तीला वास्तवात उतरवणारे , , वास्तवाहून चार पावले पुढे जाऊन विचार करणारे ,कल्पनेला सत्यतेच्या कोंदणात बसवणारे , येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे , खर्ची पडलेल्या अनेक पिढ्यांच्या कर्तुत्वाची गाथा सांगणारे शिल्प असते . मग तो सह्याद्रीच्या निबिड अरण्यात ,घनदाट जंगलात वर आलेल्या कातळावर घडवलेला अभेद्य गड असो किंवा परसात केलेला काही फुटी मातीचा किल्ला असो , आकार बदलला तरी भाव बदलत नाही . मातीचा किल्ला करणे म्हणजे आपलंच असं स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते . राजेपण जरी शिवाजीचे असले तरी त्यास ते मिळवण्यास सहाय्य कण्याची एक समृद्ध धडपड असते . हि धडपड गेली साडे तीनशे चारशे वर्ष अखंड सुरु आहे . सह्याद्रीच्या कातळात आणि शहराच्या सिमेंटात अजूनही शिवरायांचे स्मरण होते . . पूजा होते . . साधना होते . .  राजेंनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून प्रार्थना होते . ही 'परंपरा ' अनेक पिढ्यांपासून सुरु आहे . याच परंपरेतला एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळीत घडवला जाणारा 'मातीचा किल्ला ' . . .

Sunday 3 November 2013

दिवाळी "ती " आणि "ही".....


दिवाळी म्हणजे अंधकार भेदून जाणारा प्रकाशाचा सण...मग तो आसमंत मधील असो वा मना मधील .."तमसो मा जोतीर्गामय" हि उक्ती सार्थ ठरवणारा हिंदू धर्म मधील महत्वाचा आणि मानाचा सण....धन्वंतरी पूजन,लक्ष्मिपुजन,पाडवा,भाऊबीज अशा सणांनी नटलेले आणि मंतरलेले दिवस....किल्ला ,फटाके ,गोड धोड (मनापासून आणि वजन वाढीचा विचार न करता खाणे ) आताशी होत नसले तरी दिवाळीचा आनंद मात्र तसूभरही कमी होत नाही ......चकली खात असताना सहज डोक्यात विचार आला कि मागच्या वर्षी असेच बागेत बसून चकली वर ताव मारत होतो यंदाही मारत आहे मग या १क वर्षात बदल तो काय झाला ? ? आणि मग विचारांची चक्रे फटाक्याच्या चक्रा  सारखी गोल गोल फिरू लागली ...

Friday 1 November 2013

मातीचा किल्ला : भाग दोन

माणूस सदनातून सदनिकेत रहायला गेल्यापासून सहजीवनातील मजा मर्यादित झाली आहे . चाळ किंवा वाडा हे जरी सदनिकेचे प्रकार असले तरी त्यांच्या वास्तूत सहजीवन कोठेतरी खोलवर मुरलेले , रुजलेले  होते . एखाद्या खोलीतील जन्माचा आनंद  आणि एखाद्या खोलीतील मरणाचे सुतक संपूर्ण चाळ साजरे करत होती ,पाळत होती . प्रत्येक घर दुसऱ्या घराचा पार्ट होता . . सदनिकेच्या उंच्या जशा वाढत गेल्या तशा घराच्या लांब्या आणि मनाच्या खोल्या आकसत गेल्या . किलबीलणारे अंगण , कुजबुजणारे स्वयंपाकघर ,समृद्ध परसबाग हे प्रकार नामशेष झाले . माती परकी आणि पोरकी झाली . जागेच्या आणि वेळेच्या युद्धात कुटुंबाचा विस्तार सुकत गेला . .पीओपी चा किल्ला त्याच सुकलेल्या कुटुंबात , हरवलेल्या बालपणात , मोठ्यांच्या 'आमच्या वेळी असं नवतं ' या स्वगतात , सोसायटीच्या 'बरं झालं . . चिखल आणि स्वच्छता वाचली ' या स्वार्थात कुठेतरी 'कल्पतरू ' सारखा वावरत आहे ... . हा काळाने स्वीकारलेला बदल आहे . हा बदललेल्या संस्कृतीचा चेहेरा आहे . तो आपल्याला स्वीकारायलाच हवा . . . .

Thursday 31 October 2013

मातीचा किल्ला : भाग एक

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

हिन्दु धर्मात पूजनीय असलेल्या भगवत गीतेत श्री कृष्णने पुन्हा अवतार केव्हा घेईन ते स्पष्ट केले आहे . सध्या देशातील आणि देशाबाहेरील स्थिती पाहता 'अवतार ' लवकरच जन्म घेणार असे राहून राहून वाटते . . असेच काहीसे वाटत असताना विचारांच्या तंद्रीत आकाशात साचत असलेल्या ढगांकडे सपशेल दुर्लक्ष करून मी बाहेर पडलो . . आल्फ्रेड हीचकॉक हयात असते तर ' अरे हाच तो रस्ता जो मी अनेक वर्षे शोधत होतो ' म्हणून एखाद्या भयपटाची निर्मिती करून टाकली असती .दुपारच्या ४ ला चक्क अंधार , सोसाट्याचा वारा , पानांपासून ते पदरा पर्यंत हवेत उडणाऱ्या अनेक गोष्टी , हेडफोन वरून कमाल आवाजात कमालीचा ठेका असलेले गाणे ऐकत असतानाही कानाच्या पदद्यावर आदळणारा वीजा फुटल्याचा आवाज , मधूनच कडमडत जाणारे कुत्रे , कावरे बावरे होऊन झिग झेग पाळणारे मांजर , माणसांची धावपळ पक्षांची फडफड . . . हे सगळे माझ्यासाठी नाही असे समजून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पचाक पचाक पावले टाकत , कपाळावर साचलेल्या पावसाच्या थेम्बाना बेफिकीरीने उडवत ,हाफ चड्डीतले एक पोट्टे फुल एटीट्युडने समोर सरकत होते . . कदाचित कोलंबस चे गर्वगीत वाचून आले असावे . . पोट्टेच ते त्यात दखल घेण्या सारखे काय ? जो पोट्टा एका हातात अक्खा किल्ला घेऊन पुढे सरकत असेल त्याची 'दखल ' घ्यायची नाही ? मला तर कृष्णाने सुदर्शन पर्वत उचलल्याची गोष्ट आठवली . . देवा . . घेतलास अवतार अखेर तू . . दिसले रे बाबा . . तुझे पाय खड्ड्यात दिसले . . मी नमस्कार करणारच होतो . . तेवढ्यात आडोशाला माझ्या शेजारी थांबलेलं म्हातारं सवयीने खाकरलं अन मी भानावर आलो . . एक नमस्कार वाचवला जेष्ठाने . . दिवाळीत ना,  'चव बघ ' म्हणून पोटभर खायला घालतात त्याने अशी सुस्ती आणि गुंगी येते ।  असो . . सांगायचा मुद्दा असा . . त्या पोट्ट्याच्या हातातला पीओपी चा लहानसा किल्ला बघून मला माझ्या लहानपणीचा मातीचा अन शेणाचा किल्ला आठवला . . उचलता न येणारा . . वर्षभर फडताळावर ठेवता न येणारा . .

Saturday 26 October 2013

दाभोलकर खून - माझ्या मना बन दगड !



कविता करणे किंवा कवितेच्या प्रांतात रमण्याची माझी प्रकृती नाही . किंबहुना ते माझ्या किंवा वाचणाऱ्याच्या प्रकृतीला मानवत नाही . तरीही मी नेटाने कविता लिहितो . आवडीने कविता वाचतो . या वाचनात मला विंदा करंदीकरांच्या कविता मनापासून आवडतात . पटतात . आजूबाजूच्या परिस्थितीला साजेशा वाटतात . डॉ . नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला लवकरच तीन महिने पूर्ण होतील . दिवाळी साजरी करायच्या नादात तपासाचे निघालेले दिवाळे आपल्याला कोणीतरी 'सवाल ' उपस्थित करेपर्यंत समजणार नाही . हे सवालही महिन्यातून एकदाच उपस्थित होतात . वीस ते वीस असा त्यांचा प्रवास असतो . असो . . या पार्श्वभूमीवर मला विंदांच्या  माझ्या मना दगड हो
 या कवितेतल्या काही ओळी लिहाव्याश्या वाटतात . .

'हा रस्ता अटळ आहे !
ऐकू नको हा आक्रोश
तुझ्या गळ्याला पडेल शोष
कानांवरती हात धर
त्यांतूनही येतील स्वर
म्हणून म्हणतो ओत शिसे
संभाळ, संभाळ, लागेल पिसे!
रडणाऱ्या रडशील किती?
झुरणाऱ्या झुरशील किती?
पिचणाऱ्या पिचशील किती?
ऐकू नको असला टाहो
माझ्या मना दगड हो! '

Sunday 29 September 2013

निर्णय

'' Dad it's final . . . you are shifting to hydrabad ''

सहा खोल्यांच्या ऐसपैस घरातील एका कोपऱ्यात सकाळपासून भांड्याला भांडी आपटत होती . लढत होती . पोचे येउन बाजूला पडत होती पण तरीही लढत होती . साठीपार झालेले माधवराव , संधीवाताने वेग मंदावल्याने साठीकडे हळू हळू वाटचाल करणारी मीना
आणि त्यांचा एकुलता एक मुलगा राहुल यांच्यात राहत्या जागेवरून सुरु असलेला वाद . . .

' अरे कष्टाने घेतली हि जागा या जागेला काहीच किंमत नाही ? मी आयुष्यभर केलेल्या कष्टाचे प्रतिक आहे हे घर आणि ते सोडून जायचे ?? ' माधव
' oh come on dad , be practical . . काय हे प्रतिक वगिरे घेऊन बसलाय ? लोल  अहो तुमच्या प्रतीकाच्या रंगाचे पोपडे निघालेत , भिंतीना चिरा पडल्यात ''

Friday 20 September 2013

दाभोलकर - एक नवस . . . तुमच्यासाठी !

माणूस , माणूस म्हणून जगत असताना वर्तमानापेक्षा भूतकाळ अन भविष्यकाळाला जास्ती महत्व देतो . आज काय करायचे यावर कृती न करता काल काय केले आणि उद्या काय करावे लागेल या स्वप्नात रमण्यात आयुष्य खर्ची घालतो . भूत अन भविष्य समृद्ध असला तरी वर्तमानाच्या मुदलात दिवाळखोरी असते . . कारण माणसाला वास्तवापेक्षा भासमान गोष्टींचे आकर्षण आणि अप्रूप अधिक असते . . हा नियम केवळ माणसांना लागू नाही तर उर फुटेपर्यंत मृगजळाच्या पाठीमागे धावणाऱ्या हरणांना , अंत माहित असूनही आगीत झोकून देणाऱ्या पतंगाना सुद्धा लागू होतो . . कारण एकच, भासमान गोष्टींचे आकर्षण अन वास्तवापासून दूर सरकायची असलेली गडबड . . या गडबडीनेच माणूस हडबडतो अन मानसिक आधाराच्या शोधात मंदिरे -मशिदी -चर्च -आश्रम इत्यादीच्या वाटा चालू लागतो . ही ठिकाणे काहीबाही करून भूतकाळ विसरायला लावतात आणि 'तथास्तु ' म्हणून भविष्य समृद्ध करतात पण वर्तमान 'कोरडाच ' राहतो . . त्याची चिंता कोणालाच नसते . . अंध लोकांनी केलेल्या श्रद्धेच्या अतिरेकाला अंधश्रद्धा म्हणायचे नाही तर काय करायचे ?? लोकांचे भूतकाळ अन भविष्यकाळ सुलभ , सुखद , सुसह्य करणाऱ्या अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या डॉ . नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आज महिना झाला . . त्यांच्या बंडखोरीमुळे मृत्युपूर्व भूतकाळात 'बदनाम ' झालेले दाभोलकर त्यांच्या मृत्यूपश्चातच्या भविष्यात 'हिरो 'झाले पण त्यांचे मारेकरी अजूनही फरार आहेत हे 'वर्तमान ' लक्षात घ्यायला कोणीही महत्व देत नाही . . कारण माणूस , माणूस म्हणून जगत असताना वर्तमानापेक्षा भूतकाळ अन भविष्यकाळाला जास्ती महत्व देतो . . . 
                           
डॉ . नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळा , रक्ताळलेला डाग पडला आहे असे मी दाभोलकर गेल्या नंतरच्या आठ दिवसात प्रसारमाध्यमातून पाहिले -वाचले . पुरोगामित्व म्हणजे  काय ? यावर माझ्या मनाच्या दोन बाजूंवर बुद्धीच्या तिसऱ्या बाजूचा शिक्का लागायचा आहे पण दाभोलकर यांच्या खुनाने महाराष्ट्रावर एक डाग पडला हे नक्की . . . प्रत्येक राज्य डागाळलेल्या चादरी अन निर्लज्ज मने घेऊनच कारभार करत असतो त्यामुळे ' लागा चुनरी मै दाग ' सारखे सव्याचे दिवस आता संपले . पण नामुष्की क्वचितच वाट्याला येते . . दाभोलकर यांच्या खुनाचे 'राजकीय असूयेतून जन्माला घातलेले मारेकरी ' वगळता राज्य शासनाच्या हातात काही पडले आहे असे दिसत नाही . ते जाणून घ्यायची किंवा लोकांना जाणते करायची इच्छाही कोणाची नाही कारण एका महिन्यापूर्वी जो 'डाग ' होता त्याचा आता 'ठिपका ' झालाय . . निषेधाचे झेंडे , घोषणांचे फलक , मेणबत्त्या , तात्पुरत्या संवेदना दाखवणारी मने आता फडताळात पडली आहेत . . कारण विषय आता 'जुना ' झाला आहे . . . 
                          दरम्यान दाभोलकर यांच्यावर अनेक सुंदर लेख छापण्याचे पुण्यकर्म अनेक वृत्तपत्रांनी केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन . . हे लेख वाचून ' तुज आहे तुज पाशी परी तू जागा चुकलाशी ' याचा प्रत्यय अनेकदा आला . दाभोलकर लोकांना समजले नाहीत कारण त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न कोणी केला नाही . मीही केला नाही . मरणा नंतरही दोन शब्द कोणी चांगले बोलावेत असे अनेकांचे नशीब नसते . . दाभोलकर त्या बाबतीत नशीबवान मानायला हवेत . त्यांचे 'स्वप्न ' असणारे विधेयक संमत करून सरकारने त्यांच्या 'मुक्तीचा ' मार्ग मोकळा करून आपली जबाबदारी झटकली . . ठरलेल्या पठडीतले आरोप , ठरलेले दाखले , आरोप प्रत्यारोप , एकमेकांना बोटे दाखवून बोटचेपे धोरण स्वीकारणे या माकड खेळातून ' स्कॉटलंड यार्ड ' म्हणून कधीकाळी फ़ेमस असलेल्या मुंबई पोलिस दलाच्या मर्यादा पुनश्च उघड झाल्या , मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी आमच्याच दुध संघातले हो . . असे म्हणून शोकसभेत पण आपलीच लाल जगाला निर्लज्ज पणे दाखवणाऱ्या राजकारणी लोकांचा नागवेपणा पुनश्च समोर आला . . 'हा महाराष्ट्राच्या आठ कोटी जनतेचा सवाल आहे ' म्हणत मनचे दामटणाऱ्या अन महाराष्ट्राच्या भविष्याचे उत्तरदायित्व आपल्याच दाढीच्या खुंटाला बांधले आहे असा आव आणत अव्वाच्या सव्वा बोलणाऱ्या प्रसिद्धीमाध्यमांच्या 'बिकता है तो दिखता है ' हा किळसवाण्या मानसिकतेचे पुनश्च दर्शन झाले . . 'शिष्टाचार ' म्हणून एक दोन दिवस 'बरे ' बोलणाऱ्या अन नंतर आयला पोराचे नाव 'हमीद ' ठेवणारा ** गेला ते बरेच झाले म्हणून दात काढणाऱ्या समाजातील संकुचित समाजाच्या आकुंचित मनोवृत्तीचे पुनश्च दर्शन झाले . . समाजासमोर पुनश्च प्रश्न उभा राहिला . . 
           ' हम तो तुम्हे इसी तरह मारेंगे बोलो तुम क्या करोगे ' . . . अ वेनस्डे मधला बिनतोड सवाल . . विचारांना विचाराने मारायची समृद्धता आता लोप पावत आहे याचे आणखी एक रक्ताळलेले उदाहरण . . एखादा नवस फेडण्यासाठी जो नरबळी दिला जातो त्याला विरोध करणाऱ्या दाभोलकरांना , आपला (नवस ) विधेयक संमत करून घ्यायला आपलाच बळी द्यावा लागतो याहून दुर्दैव ते काय ? दाभोलकर यांच्यासारख्या कार्यकर्त्याचा -अभ्यासकाचा -साधकाचा खून होऊन एक महिना उलटला तरी पुणे -मुंबई व्हाया लंडन फिरणारा तपास प्रवास वेग घेत नसेल तर सामान्य माणसाच्या खुनाचे काय होणार ?? तपासातील अपयश हे अत्यंत निराशाजनक आहे . . जेवा वास्तवात वास्तव शिल्लक रहात नसेल तेव्हा माणूस अवास्तव गोष्टीना अतिरेकी महत्व द्यायला लागतो . . बोटे अंगठ्यानी , मनगटे दोऱ्यानी , गळे गंड्या -ताईतानी , मन नवसाने भरू लागते . . सुरु होतो निसरड्या वाटेवरचा प्रवास . . 
               
 दाभोलकर . . सिरिअलच्या एका भागात लागणारा खुनाचा तपास अन दहशतवाद्यांची अटक मला खरच सुख देते . . ते भासमान आहे मला मान्य आहे . पण एक महिना उलटूनही काही 'सुराग ' मिळू नये म्हणजे तुमचा भूतकाळ काही बरोबर नाही . पूर्वजन्मी तुम्ही  काहीतरी प्रचंड पाप केले आहे त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागली . . वर्तमानात वावरून काय मिळवले तुम्ही ?? भूतकाळ बाजूला सारला अन भविष्याला हद्दपार केले त्याचीच फळे आहेत ही . . जाऊदे जे झाले ते झाले . . मी तुमच्या साठी नवस बोलतो आज . . दाभोलकर यांच्या खुन्याचा तपास लागला तर खोदकाम न झालेल्या ज्या डोंगरावर केवळ एकच झाड शिल्लक असेल  अशा झाडाच्या ईशान्य दिशेला जर पाण्याचे निसर्गनिर्मित तळे असेल तर त्या तळ्यातील पाणी पिउन मोठा झालेला कोंबडा डोंगराच्या उत्तरेस साडेतीन फुट उंचीच्या दगडावर कापेन . . .या अटींची पूर्तता होणारा डोंगर नाही मिळाला तर अंधश्रद्धेला विरोध करणाऱ्या माणसालाच न्याय मिळावा म्हणून अंधश्रद्धा जन्माला घालण्याचे पातक माथी येणार नाही अन त्याचवेळी दाभोलकर यांचे विषयी ' कितीहो वाटते याला ' अशी फुकटची प्रसिद्धी सुद्धा वाट्याला येईल . . न्याय हवाय कोणाला ? दे टाळी . . असो दाभोलकर तुमच्या खुनाचा लवकर तपास व्हावा यासाठीच हा नवस . . कारण तुमचा लाल बहादूर शास्त्री किंवा सुभाषचंद्र बोस होऊ नये इतकीच इच्छा !! 

Tuesday 17 September 2013

एक लोहपुरूष . .

एक लोहपुरूष नरमल्याने
शरमले लोहत्व लोहातले
दुखावले पुरुषत्व पुरुषातले !

लावलेले बीज
पालकत्व नाकारू लागले
मागून आलेले द्विज
जेष्ठत्व अव्हेरु लागले
भिडले ओठ आपल्याच
दातांशी
जुंपले युद्ध आपल्याच
आप्तांशी
झाली करमणूक लोकांची
लोहपुरूष नरमल्याने !

Sunday 15 September 2013

अस्वस्थ करणारी : अनुमती

जुन्या तुळशी वृंदावनात ठेवलेली आशेची नवी वात . . . वात विझवायला कोसळणारा पाऊस . . सोसाट्याचा वारा . . निसर्गापुढे वाकलेली तुळस . . विजांचा खेळ पहात  झुलणारा एक झोका . . आशेतून निराशेत अन निराशेतून आशेत झोक्यासह हेलकावणारे मन . . दिव्याच्या अस्तित्वात आपले अस्तित्व हुडकणारे दोन डोळे . . . पावसासोबतच बरसणारे . . वाऱ्यासह भिरभिरणारे . . विजांसह कडाडणारे . . अस्तित्वाच्या संघर्षात वातीची साथ देणारे . . अनंत भावना आपल्यात सामाऊन समाजाला प्रश्न विचारणारे . .  अन सिनेमा संपल्यावरही माझी साथसोडायची 'अनुमती ' न देणारे . . . !  माणूस 'जगवण्यासाठी ' माणसाने केलेला प्रवास , संवेदनांना पाझर फोडणारा , आयुष्याची दोरी पैशाच्या वेठीला बांधले आहे हे वास्तव समोर आणणारा , एखादी व्यक्ती हवी असणे यासाठीची धडपड अन गरज प्रत्येकाची वेगळी असते  याची अनुभूती देणारा चित्रपट म्हणजे गजेंद्र अहिरे यांचा  'अनुमती ' . . . !! 

Saturday 31 August 2013

दाभोलकर : मला माफ करा !


पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन १० दिवस उलटून गेले . या दहा दिवसात बरेच काही घडून -बिघडून गेले . घडून अशासाठी की अनेकांना दाभोलकर प्रेमाचा उमाळा आला . मेल्यानंतर शत्रू सुद्धा अजातशत्रू होतो याचे ताजे उदाहरण मिळाले . बिघडून अशासाठी की ओंकारेश्वर पुलावर पडलेले दाभोलकर यांच्या रक्ताचे डाग अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत . घडलेला गुन्हा आणि बिघडलेले राजकारण यावर सहानुभूतीचा आणि कावेबाजपणाचा मुलामा म्हणून 'ते ' विधेयक संमत करून घेण्यात आले . वर्तमान पत्राचे रकाने आणि चेनेल वरचे 'प्राइम टाइम ' दाभोलकर महतीने सजू लागले . . इतके 'महान ' होते का दाभोलकर ? जर होते तर आपण त्यांचे महानपण कोठे लपवले होते ?का मृत्यूपश्चात त्यांना 'महान ' बनवून किंवा त्यांचे महानपण मान्य करून  , आपण आयुष्यभर केलेले कोडगेपण महानतेच्या मुलायम वस्त्रात लपवू पहात आहोत  ? हे प्रश्न मला रोज पडतात . दाभोलकरांच्या कार्यावर शंका म्हणून नाही तर आपल्या वृत्तीवर शंका म्हणून .  मोकळ्या घरात घोंघावणारा वारा आपल्या अस्तित्वाने घर भरून टाकतो . . चार पाने उचलून आणून आणि घरातली चार पाने दोन जळमटे बाहेर टाकून रिकाम्या घरास काहीतरी सजीवत्व देतो . . पण . . बधिर झालेल्या संवेदनांना आपल्या शेपटाला बांधून मोकळ्या मनात फिरणारा पश्चात्तापाचा वारा  यांचा मृत्यू 'स्वीकारणारा ,पचवणारा ' मी जिवंत का आहे ? याची बोच देतो . माझे सजीवत्व निर्जीव करून टाकतो  . . याच बोचऱ्या मनाने मी रोज म्हणतो ' दाभोलकर : मला माफ करा ! ''

Wednesday 28 August 2013

50 years of I have a dream

I am happy to join with you today in what will go down in history as the greatest demonstration for freedom in the history of our nation.
Five score years ago, a great American, in whose symbolic shadow we stand today, signed the Emancipation Proclamation. This momentous decree came as a great beacon light of hope to millions of Negro slaves who had been seared in the flames of withering injustice. It came as a joyous daybreak to end the long night of their captivity.
But one hundred years later, the Negro till is not free. One hundred years later, the life of the Negro is still sadly crippled by the manacles of segregation and the chains of discrimination.

Friday 23 August 2013

बातमीला एक दिवस वाटलं . . आपण बातमीत याव

बातमीला एक दिवस वाटलं 

आपण बातमीत यावं 
आठ कॉलमच्या प्रतिष्ठेच्या जागेत
ऐसपैस पसरावं 
एक दोन कॉलमना हिणवावं 
चार पाच कॉलमना जळवावं 
बातम्यांच्या राज्यावर आपणच राज्य कराव
बातमीला एक दिवस वाटलं 
आपण बातमीत याव

Tuesday 20 August 2013

समदुक्खी . .

भविष्य मांडणारे आणि भविष्यालाच अंधश्रद्धा मानणारे एकाच दिवशी गेले.  हा 'योगायोग ' मानायचा का ? योगायोग मानला तर एकाच्या कार्याला सलाम मिळेल तर एकाच्या कार्याचा विनोद होईल . हेमंत करकरे मारले गेल्यानंतर ज्या भावना 'कट्टर ' लोकांच्या मनात असतील . त्या आज पुन्हा उचंबळून वर आल्या असतील . या भावना जपायला भगवा टिळा , गोल टोपी , चंदनाचा उभी रेघ , पांढरी आडवी रेघ , निळा किंवा जांभळा पटका , पिवळा शेला इत्यादी लागत नाही . मार्ग चुकलेल्या लोकांना धर्म नसतो . जात नसते . आत्मभान नसते . विवेक नसतो . विचार नसतो . मन असते - नसते . डोके असते पण मेंदू जळमटानी भरलेला आणि भारलेला असतो . 'श्रेष्ठत्वाचा ' किडा त्याच्या संक्रामक क्षमतेनुसार सदसदविवेक बुद्धी आणि बुद्धी यात पूर्वग्रहदुषीततेचे 'जाळे ' विणायला सुरुवात करतो . स्वतः कोणाच्यातरी वैचारिक जाळ्यात अडकलेले आपल्याही डोक्यात 'नेत्या ' सारखे जाळे तयार होत आहे या दुराभिमानाने बिथरतात आणि मानवतेचा त्याग करतात . ज्यांच्यात पावलीभर माणुसकी शिल्लक आहे त्यांना धर्माची योग्य शिकवण योग्य मार्गाने देऊन वाचवता येते . ज्यांना धर्मांधतेचा लकवा मारला आहे त्यास इलाज नाही . निकामी असे अवयव आणि वासलात लागलेले मुद्दे घेऊन समाजात वावरणे आणि आपल्या लाकव्याचे उदात्तीकरण करणे याहून दुसरा मार्ग त्यास दिसत नाही . त्यास वास्तवाची गोळी द्यायला लागते . पहिल्याला जयंतरावांनी वाचवले तर दुसऱ्याला नरेंद्रजी नी !
                   लोकशाहिची दिन -दिशा दर्शिका रक्ताने लिहिली जात असेल तर ते लिहिताना  आपले हात बरबटायला नको म्हणून जयंतराव गेले . आणि दर्शिका आपल्या च मतानुसार आणि मनानुसार लिहिता यावी म्हणून दाभोळकराना पाठवले . दोन्ही लोकांचे कार्यकर्ते दुक्खी असतील पण शोकाकुलतेत फरक आहे . काही दिवस सामाजिक सभ्यतेचे नियम म्हणून दाभोळकर 'हिरो ' होतील . नंतर व्यक्तीस्वातंत्र्याचा उपभोग घेण्या साठीच आपला आणि आपल्या इंद्रियाचा जन्म झाला आहे या श्वान गणातील मनुष्य गोत्री मनसोक्त उपभोग घेतील . 'आपला धर्म ' सुटला म्हणून आनंद साजरा करतील . हे चक्र थांबणारे नाही . . . मुद्दे चार्चीण्यातले थोरत्व , त्यांचे खंडन करण्यातले पांडित्य , माघार स्वीकारण्यातले नम्रत्व याचा लोप पावून पुचाट मुद्दे अन विचार घेऊन शाब्दिक -शारीरिक वार करण्याचे षंढत्व वाढल्याने साधनेत खंड पडते . आज महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्य हरपले . भूतकाळातील भुते आज चंद्राला झाकोळून अमावस्या साजरी करण्याच्या प्रयत्नात असतील . त्यांचे महत्व आणि दरारा कदाचित पुन्हा वाढेल .कदाचित विधेयक कायमचे 'स्वाहा ' झाले म्हणून नारळ फोडतील . आपले कार्य मनुष्य व्यवस्थित करत असल्याने आपण 'व्ही . आर . एस ' घ्यावी या मतावर एकमत होईल . अदृश्य भुते आणि दृश्य मानव (?) यांना आनंद साजरा करायचे आणखी एक कारण मिळेल . 
                  
                    जयंतराव आणि दाभोलकर अनंतात एकमेकांची निश्चित भेट घेतील . दाभोळकर म्हणतील ' जयंतराव भविष्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही . माणूस कर्तुत्वाने घडतो आणि कर्तुत्वानेच बिघडतो . कार्य हे जरी अंतिम सत्य असले तरी 'ध्येय ' माणसाचे रस्ते बदलवते . गती मिळावी म्हणून बांधलेले गंडे दोरे , लावलेले कुंकू गुलाल , कापलेले कोंबडे बोकड आणि ठेवलेला पिंडा समोरचा भात खरच गती देतो का ? मला मुक्ती मिळावी म्हणून शेकडो जण अनेकविध प्रयत्न करतील . आश्वासनांची शिडी बांधून येथपर्यंत येतील . स्व इच्छा माझ्या इच्छा म्हणून पूर्ण करून घेतील . माझी इच्छा कदाचित पूर्ण होईल पण कार्य अपूर्णच राहील . माणसाला पूर्णत्व मिळाले की त्याचा देव होतो म्हणतात . . . तो व्हायची मला लालसा नाही . पण कार्याला पूर्णत्व मिळवून कार्यपूर्ण होण्याचा मानस अधुरा राहिला . . . ' ' जयंतराव हसून म्हणतील ' दोन समदुक्ख्यांची एकाच वेळी सुटका झाली "

भिन्न किंवा परस्पर विरोधी क्षेत्रातील दोहोंच्या कार्यास 'सलाम ' !! 

Saturday 10 August 2013

चेन्नई एक्सप्रेस - सुटलेलीच बरी !!


कधी शेट्टी च्या हॉटेल मध्ये गेलाय ?? इडली ,मेदू वडा , डोसा ,उत्तप्पा ,अप्पम  असे काहीही मागितले तरी 'सांबर ' मात्र कॉमन असते . . एकदाच बनवून ठेवलेले . . वाटीत भरून ठेवलेले . घरोघरी ओरड असतेच . . इडली जमते हो . . पण सांबर 'शेट्टी 'चच . . असे हे शेट्टी एकदा व्यवस्थित शिजलेल्या डाळीत 'लोकांची मागणी ' म्हणून पाणी वाढवत जातात अन एक दिवस सांबर पेक्षा घरची कटाची आमटी बरी वाटू लागते ..  वापरून वापरून बुरा आलेली डाळ आणि रंगीत पाणी एकदा चवीने ,दुसऱ्यांदा कौतुकाने , तिसऱ्यांदा नाईलाजाने खाल्ली जाते पण चौथ्यांदा खाताना त्या 'शेट्टी ' च्या कुळाचा उद्धार नक्कीच होतो . . तद्दन गल्लाभरू ताज्या इडल्या वर्षानुवर्षे वापरून पाणचट झालेल्या सांबाराबरोबर वाढणाऱ्या रोहित नामक शेट्टीची ताजी इडली म्हणजे ' चेन्नई एक्सप्रेस' . . हॉटेल वाले शेट्टी आपल्या ग्राहकांची आणि मालाच्या दर्ज्याची काळजी घेतात पण सिनेमावाला शेट्टी मात्र नेहमीच 'गोलमाल ' करतो !! 
                   
बन के तितली दिल उडा कही दूर 
हिंदी सिनेमात जितक्या वेळा 'गाजर का हलवा ' बनला असेल त्यात एखादा डझन 'मा की /खानदानी चुडिया ' मिसळल्या तर जो आकडा येईल तितक्या वेळा 'दादाजी -दादिजी की अस्थियोंका विसर्जन झाले असेल . हा सिनेमा सुरु होतो दादाजीके अस्थियोंके कलश से आणि संपतो खाली कलश मै लोगोंकी गालीया भरके . कथा एकदम सिंपल आहे . आजीच्या भावना ,नातवाचे प्लानिंग , हिरोइन ची एन्ट्री , हीरोचे हृदयपरिवर्तन , अचानक झालेला प्रेमाचा साक्षात्कार आणि हेपी एंडिंग . . सिम्पल आहे न ? मधून मधून शेट्टी साहेब फुटाणे उडवल्या सारखे गाड्या उडवतात , चिप्स खाऊन पिशवी फोडतो तशा गाड्या फोडतात , पाणचट विनोद आचरट अभिनयावर शिंपडतात , गाण्याच्या भेंड्या लाऊन बेर्डे टाईप गाण्यांची आठवण करून देतात , मरतुकड्या हिरोकडून दांड सांड व्हिलनला  चिरकुट असल्या सारखे बडवून घेतात , मिसळीला जरा चव आली म्हणे परेंत दाताखाली फरसाण्यातला बेदाणा यावा तशी गाणी घुसडतात आणि सुंदर लोकेशन दाखवून थक्क करून सोडतात . . त्यांच्या सांबाराचा हाच 'हिट फोर्मुला ' आहे . त्यामुळे चेन्नई मध्ये नवीन काही पाहतोय असे वाटतच नाही . . .  इडली शिळी झाल्यावर त्याचे इडली फ्राय करून पैसे मिळवतात तसा हा प्रकार आहे . त्यामुळे यावेळी आकर्षण शेट्टी चे नवते तर शाहरुख खानचे होते . आकर्षण का प्रतीक्षा याबाबत मी तितकाच संभ्रमात आहे जितका सिनेमाचा कथा (?) लेखक सिनेमा रिलीज झाल्यावरही असेल . . असो . . 
                 
राहुल . . इल्ला परफोरमन्सा 
रिअल लाईफ मध्ये अनेक विवादात लीड रोल केल्यावर अखेर शाहरुख खान ला रिल लाइफ मध्ये जायला वेळ मिळाला . रा वन , डॉन २ , जब तक है जान सणकून आपटल्यावर आपली बादशाहत टिकवण्यासाठी धडपडणारा किंग संपूर्ण सिनेमात बावचळल्या आणि बावरल्यासारखा वाटतो . काही प्रसंगी फिल्मफ़ेअर पुरस्कार सोहळ्यातील  वाह्यातपणा कॉपी -पेस्ट करताना दिसतो . 'मै हु डॉन ' याची लोकांना आठवण करून द्यायला आपल्या सुपरहिट सिनेमातील दृश्यांचा आधार घेतो . तरीही तो बघवत नाही . वारंवार गॉगल घालण , 'कॉमन मेन ' चा डायलॉग आपल्या 'बाहे फैलाकर ' स्टाइल मध्ये फेकणे , नेहमीप्रमाणे नाका तोंडातून रक्त येई परेंत बुकलून मार खाणे आणि नायिकेचा आवाज ऐकल्यावर अंगात रेम्बो चा आत्मा शिरल्या सारखे खलनायकाला तुडवणे हा फोर्मुला शेट्टीच्या सांबारा इतका शिळा आणि पाणचट आहे . 'राहुल ' च्या वलयाला शाहरुख न्याय देऊ शकत नाही . बऱ्याच ठिकाणी आलेले दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे , कुछ कुछ होता है चे संदर्भ 'नॉस्टाल्जिक ' करतात आणि शेट्टीकथे पासून काही क्षण वाचवतात .झकास  राहुल रंगवायच्या नादात कुठल्या कथेतून किती अनावश्यक प्रसंग उचलतोय यात 'गोलमाल ' झाल्याने बोलबच्चन राहुल बुडीतखाती निघतो . बौद्धिक देणे आणि सवईचे डायलॉग नवीनच काहीतरी करत आहोत अशा अभिनयातून सादर करणे यापलीकडे राहुल जात नाही . असेच एक दोन सिनेमे शाहरुख ने केले तर शाहरुख खानचा कादरखान व्हायला वेळ लागणार नाही . 
                 
मिनम्मा . . दीपिका एक्सप्रेस सुसाट धावतीये 
अभिनयाच्या बाबतीत दीपिका बाजी मारते . तमिळस्टाईल हिंदी लवकरच युथ मध्ये 'इन ' होईल . विनोदाचे टायमिंग आणि सेंटी होण्यातला सेन्स तिने अचूक पकडलाय . त्यामुळे सिनेमा सबकुछ शाहरुख न राहता दीपिका ने अपनी जगह बनाली है बॉस . . बाकी सिनेमाबद्दल सांगण्या सारखे काहीही नाही . राज ठाकरे यांनी थोडा धीर धरला असता तर दुनियादारी साठी आंदोलन करायची वेळच आली नसती . बाकी कोणता सिनेमा रिलीज न झाल्याने शेट्टी सांबर पासून रिलीफ मिळवण्यासाठी लोकांनी दुनियादारी आवर्जून पाहिला असता . थेटरमालकांनी मोकळ्या खुर्च्यांना चेन्नई एक्सप्रेस दाखवण्या पेक्षा भरलेल्या खुर्च्यांना दुनियादारी दाखवण्याचे फायद्याचे गणित नक्कीच मांडले असते . सिनेमाची एक आणि एकमेव उत्तम बाब म्हणजे सिनेफोटोग्राफी . . ज्यांनी दक्षिण पाहिला नाही त्यांना मोहात पाडणारे  आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांना पुनश्च प्रेमात पाडणारे सीन यात आहेत . संगीत यथा तथा . अभिनय  'यालाच  अभिनय म्हणतात माइंड इट ' या पठडीतला . . दिग्दर्शन आपल्या आणि दिग्दर्शकाच्या सवईचे . . त्यामुळे एसी हॉल मध्ये, मऊ खुर्च्यांवर बसून बचकं  भर पॉपकॉर्न पोतभर पैसे ओतून खायचे असतील तरच (डोकेदुखी थांबण्याची गोळी घेऊन ) चेन्नई एक्सप्रेस मध्ये बसावे . . . नाहीतर चेन्नई एक्सप्रेस सुटलेलीच बरी !! 

चित्रपट - चेन्नई एक्सप्रेस
कलाकार - शाहरुख खान , दीपिका पदुकोण , सत्यराज 
दिग्दर्शक -रोहित शेट्टी 
निर्माता - गौरी खान 
              रॉनी स्क्रूवाला 
              सिद्धार्थ रॉय कपूर 
संगीत -विशाल शेखर 


टाळ्या शिट्ट्या फेटे - २  / ५ 


(खुलासा - तमाम उडपी हॉटेल चालवणाऱ्या शेट्टी लोकांबद्दल मला आदर आहे . अनेकदा मी त्यांच्या हॉटेलात जाऊन त्यांच्या इडली सांबर चा आस्वाद घेतो . केवळ विषयाची गरज आणि आडनावाचे सार्धम्य यामुळे उल्लेख केला आहे .हॉटेल वाले  शेट्टी त्यांच्या खाद्य पदार्थात चुकीचे पदार्थ वापरतात असे माझे म्हणणे नाही . कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी )

Thursday 8 August 2013

शहीद होण्यासाठीपण नशीब लागते

शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 
भारतीय सैन्यात दाखल व्हावे लागते 
मिसरूडफुटलेले असो वा केस पांढरे झाले असो 
आयुष्यभर 'जवान ' म्हणून मिरवावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

सीमेवरची तार डोळ्यात प्राण आणून रक्षावी लागते 
प्राण जात असताना घरच्या तारेकडे प्राण जाईपर्यंत पहावे लागते  
कोण बाहेरचे अन कोण आतले 
दोहोसह सतत झुंजावे  लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

उगवतो एक दिवस, एक रात्र मावळते 
उलटतात आठवडे अन सरतात वर्षे 
काळावर एकदिवस काळच घाला घालतो 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते  

ज्या तिरंग्यासाठी केला अट्टाहास 
ज्याच्या सन्मानासाठी दिले आपले प्राण 
तोच तिरंगा अंगाभोवती लपेटल्यावर काय सुख मिळते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

कारण नसताना होते ते राजकारण 
कारण असताना होते ते सत्ताकारण 
राजकारण आणि सत्ताकारण अनुभवायला
 सीमेवर जावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

गोळी घुसेल बॉम्ब फुटेल 
शिरहीन देह भडाग्नित जळेल 
अक्रोशांच्या फैरी आणि अश्रूंची सलामी मिळेल 
हे बघून क्रियाकर्म करणाऱ्या पोराला वाटेल 
मला पोरका करून बा कायतर करून गेला 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

तिरंग्याच्या भगव्यात दिसतो बाचा पटका 
हिरव्यात दिसते गावचे शेत अन हिरवा चुडा 
चक्रात दिसतं मायचा तवा अन भाकर खरडा 
पांढऱ्यात दिसते माझ्या बायकोचे कपाळ 
हे सगळे काही क्षणात अनुभवायला मरावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

मोर्चे निघण्यास सभा भरण्यास 
कमानी उभारण्यास अन पुरस्कार मिळण्यास 
दहनाचा सोहळा 'लाइव ' होण्यास 
सीमेवर जावे लागते 
लढता लढता मरावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

कितीदिवस मरायचे अन सोसायचे ?
वळणाऱ्या मुठी अन स्फुरणारे बाहू किती दिवस रोखायचे ?
समोर दिसणाऱ्या शत्रूला कितीदिवस मोकाट सोडायचे 
सोडलेल्या शत्रूकडून किती दिवस 'चकमकीत ' मरायचे ?
अहिंसा मानणाऱ्या देशाचे हेच तर दुखणे  असते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते  

मी वर जाईपर्यंत अजून दोन चार येतील 
ते येईपरेंत अक्खी रेजिमेंट येईल 
वरच भरेल मग शहिदांचा मेळा
जो एकमुखाने गरजेल 
आता तरी कबुतरे उडवायचे थांबवा 
कमी जवानांची नाही तर 
धोरणांची आहे 
भीती मरणाची नाही तर
 मेल्यानंतरच्या राजकारणाची आहे 
एकदिवस शहिदांची रेजिमेंट करेल हल्ला 
सोडवेल काश्मीर अन भयमुक्त करेल तिरंगा 
तेवाच अखंड भारत बोलेल ,
''शहीद होण्यासाठीपण नशीब लागते "


पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांत वारंवार शहीद होणाऱ्या जवानांना हतबल भारतीयाचा मानाचा मुजरा . . तुमची घरे मोडतात म्हणून आमची उभी राहतात . . तुमच्या घरी चुडे फुटतात म्हणून आमच्या घरी येतात . त्यागाने सुरु होणारे आणि शहीद होऊन संपणारे तुमचे आयुष्य म्हणजे दुराभिमान आणि अभिमान यात सुरु असलेले अखंड युद्ध . कदाचित कधीच न संपणारे . . . सार्थ अभिमान आहे मला तुमचा आणि सीमेवर अखंड पाहरा देणाऱ्या जवानांचा . . तुमचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही , तुमच्या यशोगाथा केवळ एखादी कमान ,चक्र किंवा समाधीपुरती मर्यादित राहणार नाही . .जात -धर्म विसरून  ती प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या धमन्यातून त्यागाची आणि लढ्याची प्रेरणा देत वाहेल . . एकदिवस तुमचे आमचे देशाचे स्वप्न साकार करेल तेव्हा आपण अभिमानाने म्हणू ' व्यर्थ न गेले बलिदान ' 

अंकुर