Saturday 31 August 2013

दाभोलकर : मला माफ करा !


पुण्यात नरेंद्र दाभोलकर यांची हत्या होऊन १० दिवस उलटून गेले . या दहा दिवसात बरेच काही घडून -बिघडून गेले . घडून अशासाठी की अनेकांना दाभोलकर प्रेमाचा उमाळा आला . मेल्यानंतर शत्रू सुद्धा अजातशत्रू होतो याचे ताजे उदाहरण मिळाले . बिघडून अशासाठी की ओंकारेश्वर पुलावर पडलेले दाभोलकर यांच्या रक्ताचे डाग अजूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत . घडलेला गुन्हा आणि बिघडलेले राजकारण यावर सहानुभूतीचा आणि कावेबाजपणाचा मुलामा म्हणून 'ते ' विधेयक संमत करून घेण्यात आले . वर्तमान पत्राचे रकाने आणि चेनेल वरचे 'प्राइम टाइम ' दाभोलकर महतीने सजू लागले . . इतके 'महान ' होते का दाभोलकर ? जर होते तर आपण त्यांचे महानपण कोठे लपवले होते ?का मृत्यूपश्चात त्यांना 'महान ' बनवून किंवा त्यांचे महानपण मान्य करून  , आपण आयुष्यभर केलेले कोडगेपण महानतेच्या मुलायम वस्त्रात लपवू पहात आहोत  ? हे प्रश्न मला रोज पडतात . दाभोलकरांच्या कार्यावर शंका म्हणून नाही तर आपल्या वृत्तीवर शंका म्हणून .  मोकळ्या घरात घोंघावणारा वारा आपल्या अस्तित्वाने घर भरून टाकतो . . चार पाने उचलून आणून आणि घरातली चार पाने दोन जळमटे बाहेर टाकून रिकाम्या घरास काहीतरी सजीवत्व देतो . . पण . . बधिर झालेल्या संवेदनांना आपल्या शेपटाला बांधून मोकळ्या मनात फिरणारा पश्चात्तापाचा वारा  यांचा मृत्यू 'स्वीकारणारा ,पचवणारा ' मी जिवंत का आहे ? याची बोच देतो . माझे सजीवत्व निर्जीव करून टाकतो  . . याच बोचऱ्या मनाने मी रोज म्हणतो ' दाभोलकर : मला माफ करा ! ''

Wednesday 28 August 2013

50 years of I have a dream

I am happy to join with you today in what will go down in history as the greatest demonstration for freedom in the history of our nation.
Five score years ago, a great American, in whose symbolic shadow we stand today, signed the Emancipation Proclamation. This momentous decree came as a great beacon light of hope to millions of Negro slaves who had been seared in the flames of withering injustice. It came as a joyous daybreak to end the long night of their captivity.
But one hundred years later, the Negro till is not free. One hundred years later, the life of the Negro is still sadly crippled by the manacles of segregation and the chains of discrimination.

Friday 23 August 2013

बातमीला एक दिवस वाटलं . . आपण बातमीत याव

बातमीला एक दिवस वाटलं 

आपण बातमीत यावं 
आठ कॉलमच्या प्रतिष्ठेच्या जागेत
ऐसपैस पसरावं 
एक दोन कॉलमना हिणवावं 
चार पाच कॉलमना जळवावं 
बातम्यांच्या राज्यावर आपणच राज्य कराव
बातमीला एक दिवस वाटलं 
आपण बातमीत याव

Tuesday 20 August 2013

समदुक्खी . .

भविष्य मांडणारे आणि भविष्यालाच अंधश्रद्धा मानणारे एकाच दिवशी गेले.  हा 'योगायोग ' मानायचा का ? योगायोग मानला तर एकाच्या कार्याला सलाम मिळेल तर एकाच्या कार्याचा विनोद होईल . हेमंत करकरे मारले गेल्यानंतर ज्या भावना 'कट्टर ' लोकांच्या मनात असतील . त्या आज पुन्हा उचंबळून वर आल्या असतील . या भावना जपायला भगवा टिळा , गोल टोपी , चंदनाचा उभी रेघ , पांढरी आडवी रेघ , निळा किंवा जांभळा पटका , पिवळा शेला इत्यादी लागत नाही . मार्ग चुकलेल्या लोकांना धर्म नसतो . जात नसते . आत्मभान नसते . विवेक नसतो . विचार नसतो . मन असते - नसते . डोके असते पण मेंदू जळमटानी भरलेला आणि भारलेला असतो . 'श्रेष्ठत्वाचा ' किडा त्याच्या संक्रामक क्षमतेनुसार सदसदविवेक बुद्धी आणि बुद्धी यात पूर्वग्रहदुषीततेचे 'जाळे ' विणायला सुरुवात करतो . स्वतः कोणाच्यातरी वैचारिक जाळ्यात अडकलेले आपल्याही डोक्यात 'नेत्या ' सारखे जाळे तयार होत आहे या दुराभिमानाने बिथरतात आणि मानवतेचा त्याग करतात . ज्यांच्यात पावलीभर माणुसकी शिल्लक आहे त्यांना धर्माची योग्य शिकवण योग्य मार्गाने देऊन वाचवता येते . ज्यांना धर्मांधतेचा लकवा मारला आहे त्यास इलाज नाही . निकामी असे अवयव आणि वासलात लागलेले मुद्दे घेऊन समाजात वावरणे आणि आपल्या लाकव्याचे उदात्तीकरण करणे याहून दुसरा मार्ग त्यास दिसत नाही . त्यास वास्तवाची गोळी द्यायला लागते . पहिल्याला जयंतरावांनी वाचवले तर दुसऱ्याला नरेंद्रजी नी !
                   लोकशाहिची दिन -दिशा दर्शिका रक्ताने लिहिली जात असेल तर ते लिहिताना  आपले हात बरबटायला नको म्हणून जयंतराव गेले . आणि दर्शिका आपल्या च मतानुसार आणि मनानुसार लिहिता यावी म्हणून दाभोळकराना पाठवले . दोन्ही लोकांचे कार्यकर्ते दुक्खी असतील पण शोकाकुलतेत फरक आहे . काही दिवस सामाजिक सभ्यतेचे नियम म्हणून दाभोळकर 'हिरो ' होतील . नंतर व्यक्तीस्वातंत्र्याचा उपभोग घेण्या साठीच आपला आणि आपल्या इंद्रियाचा जन्म झाला आहे या श्वान गणातील मनुष्य गोत्री मनसोक्त उपभोग घेतील . 'आपला धर्म ' सुटला म्हणून आनंद साजरा करतील . हे चक्र थांबणारे नाही . . . मुद्दे चार्चीण्यातले थोरत्व , त्यांचे खंडन करण्यातले पांडित्य , माघार स्वीकारण्यातले नम्रत्व याचा लोप पावून पुचाट मुद्दे अन विचार घेऊन शाब्दिक -शारीरिक वार करण्याचे षंढत्व वाढल्याने साधनेत खंड पडते . आज महाराष्ट्राचे वर्तमान आणि भविष्य हरपले . भूतकाळातील भुते आज चंद्राला झाकोळून अमावस्या साजरी करण्याच्या प्रयत्नात असतील . त्यांचे महत्व आणि दरारा कदाचित पुन्हा वाढेल .कदाचित विधेयक कायमचे 'स्वाहा ' झाले म्हणून नारळ फोडतील . आपले कार्य मनुष्य व्यवस्थित करत असल्याने आपण 'व्ही . आर . एस ' घ्यावी या मतावर एकमत होईल . अदृश्य भुते आणि दृश्य मानव (?) यांना आनंद साजरा करायचे आणखी एक कारण मिळेल . 
                  
                    जयंतराव आणि दाभोलकर अनंतात एकमेकांची निश्चित भेट घेतील . दाभोळकर म्हणतील ' जयंतराव भविष्यावर मी कधीच विश्वास ठेवला नाही . माणूस कर्तुत्वाने घडतो आणि कर्तुत्वानेच बिघडतो . कार्य हे जरी अंतिम सत्य असले तरी 'ध्येय ' माणसाचे रस्ते बदलवते . गती मिळावी म्हणून बांधलेले गंडे दोरे , लावलेले कुंकू गुलाल , कापलेले कोंबडे बोकड आणि ठेवलेला पिंडा समोरचा भात खरच गती देतो का ? मला मुक्ती मिळावी म्हणून शेकडो जण अनेकविध प्रयत्न करतील . आश्वासनांची शिडी बांधून येथपर्यंत येतील . स्व इच्छा माझ्या इच्छा म्हणून पूर्ण करून घेतील . माझी इच्छा कदाचित पूर्ण होईल पण कार्य अपूर्णच राहील . माणसाला पूर्णत्व मिळाले की त्याचा देव होतो म्हणतात . . . तो व्हायची मला लालसा नाही . पण कार्याला पूर्णत्व मिळवून कार्यपूर्ण होण्याचा मानस अधुरा राहिला . . . ' ' जयंतराव हसून म्हणतील ' दोन समदुक्ख्यांची एकाच वेळी सुटका झाली "

भिन्न किंवा परस्पर विरोधी क्षेत्रातील दोहोंच्या कार्यास 'सलाम ' !! 

Saturday 10 August 2013

चेन्नई एक्सप्रेस - सुटलेलीच बरी !!


कधी शेट्टी च्या हॉटेल मध्ये गेलाय ?? इडली ,मेदू वडा , डोसा ,उत्तप्पा ,अप्पम  असे काहीही मागितले तरी 'सांबर ' मात्र कॉमन असते . . एकदाच बनवून ठेवलेले . . वाटीत भरून ठेवलेले . घरोघरी ओरड असतेच . . इडली जमते हो . . पण सांबर 'शेट्टी 'चच . . असे हे शेट्टी एकदा व्यवस्थित शिजलेल्या डाळीत 'लोकांची मागणी ' म्हणून पाणी वाढवत जातात अन एक दिवस सांबर पेक्षा घरची कटाची आमटी बरी वाटू लागते ..  वापरून वापरून बुरा आलेली डाळ आणि रंगीत पाणी एकदा चवीने ,दुसऱ्यांदा कौतुकाने , तिसऱ्यांदा नाईलाजाने खाल्ली जाते पण चौथ्यांदा खाताना त्या 'शेट्टी ' च्या कुळाचा उद्धार नक्कीच होतो . . तद्दन गल्लाभरू ताज्या इडल्या वर्षानुवर्षे वापरून पाणचट झालेल्या सांबाराबरोबर वाढणाऱ्या रोहित नामक शेट्टीची ताजी इडली म्हणजे ' चेन्नई एक्सप्रेस' . . हॉटेल वाले शेट्टी आपल्या ग्राहकांची आणि मालाच्या दर्ज्याची काळजी घेतात पण सिनेमावाला शेट्टी मात्र नेहमीच 'गोलमाल ' करतो !! 
                   
बन के तितली दिल उडा कही दूर 
हिंदी सिनेमात जितक्या वेळा 'गाजर का हलवा ' बनला असेल त्यात एखादा डझन 'मा की /खानदानी चुडिया ' मिसळल्या तर जो आकडा येईल तितक्या वेळा 'दादाजी -दादिजी की अस्थियोंका विसर्जन झाले असेल . हा सिनेमा सुरु होतो दादाजीके अस्थियोंके कलश से आणि संपतो खाली कलश मै लोगोंकी गालीया भरके . कथा एकदम सिंपल आहे . आजीच्या भावना ,नातवाचे प्लानिंग , हिरोइन ची एन्ट्री , हीरोचे हृदयपरिवर्तन , अचानक झालेला प्रेमाचा साक्षात्कार आणि हेपी एंडिंग . . सिम्पल आहे न ? मधून मधून शेट्टी साहेब फुटाणे उडवल्या सारखे गाड्या उडवतात , चिप्स खाऊन पिशवी फोडतो तशा गाड्या फोडतात , पाणचट विनोद आचरट अभिनयावर शिंपडतात , गाण्याच्या भेंड्या लाऊन बेर्डे टाईप गाण्यांची आठवण करून देतात , मरतुकड्या हिरोकडून दांड सांड व्हिलनला  चिरकुट असल्या सारखे बडवून घेतात , मिसळीला जरा चव आली म्हणे परेंत दाताखाली फरसाण्यातला बेदाणा यावा तशी गाणी घुसडतात आणि सुंदर लोकेशन दाखवून थक्क करून सोडतात . . त्यांच्या सांबाराचा हाच 'हिट फोर्मुला ' आहे . त्यामुळे चेन्नई मध्ये नवीन काही पाहतोय असे वाटतच नाही . . .  इडली शिळी झाल्यावर त्याचे इडली फ्राय करून पैसे मिळवतात तसा हा प्रकार आहे . त्यामुळे यावेळी आकर्षण शेट्टी चे नवते तर शाहरुख खानचे होते . आकर्षण का प्रतीक्षा याबाबत मी तितकाच संभ्रमात आहे जितका सिनेमाचा कथा (?) लेखक सिनेमा रिलीज झाल्यावरही असेल . . असो . . 
                 
राहुल . . इल्ला परफोरमन्सा 
रिअल लाईफ मध्ये अनेक विवादात लीड रोल केल्यावर अखेर शाहरुख खान ला रिल लाइफ मध्ये जायला वेळ मिळाला . रा वन , डॉन २ , जब तक है जान सणकून आपटल्यावर आपली बादशाहत टिकवण्यासाठी धडपडणारा किंग संपूर्ण सिनेमात बावचळल्या आणि बावरल्यासारखा वाटतो . काही प्रसंगी फिल्मफ़ेअर पुरस्कार सोहळ्यातील  वाह्यातपणा कॉपी -पेस्ट करताना दिसतो . 'मै हु डॉन ' याची लोकांना आठवण करून द्यायला आपल्या सुपरहिट सिनेमातील दृश्यांचा आधार घेतो . तरीही तो बघवत नाही . वारंवार गॉगल घालण , 'कॉमन मेन ' चा डायलॉग आपल्या 'बाहे फैलाकर ' स्टाइल मध्ये फेकणे , नेहमीप्रमाणे नाका तोंडातून रक्त येई परेंत बुकलून मार खाणे आणि नायिकेचा आवाज ऐकल्यावर अंगात रेम्बो चा आत्मा शिरल्या सारखे खलनायकाला तुडवणे हा फोर्मुला शेट्टीच्या सांबारा इतका शिळा आणि पाणचट आहे . 'राहुल ' च्या वलयाला शाहरुख न्याय देऊ शकत नाही . बऱ्याच ठिकाणी आलेले दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे , कुछ कुछ होता है चे संदर्भ 'नॉस्टाल्जिक ' करतात आणि शेट्टीकथे पासून काही क्षण वाचवतात .झकास  राहुल रंगवायच्या नादात कुठल्या कथेतून किती अनावश्यक प्रसंग उचलतोय यात 'गोलमाल ' झाल्याने बोलबच्चन राहुल बुडीतखाती निघतो . बौद्धिक देणे आणि सवईचे डायलॉग नवीनच काहीतरी करत आहोत अशा अभिनयातून सादर करणे यापलीकडे राहुल जात नाही . असेच एक दोन सिनेमे शाहरुख ने केले तर शाहरुख खानचा कादरखान व्हायला वेळ लागणार नाही . 
                 
मिनम्मा . . दीपिका एक्सप्रेस सुसाट धावतीये 
अभिनयाच्या बाबतीत दीपिका बाजी मारते . तमिळस्टाईल हिंदी लवकरच युथ मध्ये 'इन ' होईल . विनोदाचे टायमिंग आणि सेंटी होण्यातला सेन्स तिने अचूक पकडलाय . त्यामुळे सिनेमा सबकुछ शाहरुख न राहता दीपिका ने अपनी जगह बनाली है बॉस . . बाकी सिनेमाबद्दल सांगण्या सारखे काहीही नाही . राज ठाकरे यांनी थोडा धीर धरला असता तर दुनियादारी साठी आंदोलन करायची वेळच आली नसती . बाकी कोणता सिनेमा रिलीज न झाल्याने शेट्टी सांबर पासून रिलीफ मिळवण्यासाठी लोकांनी दुनियादारी आवर्जून पाहिला असता . थेटरमालकांनी मोकळ्या खुर्च्यांना चेन्नई एक्सप्रेस दाखवण्या पेक्षा भरलेल्या खुर्च्यांना दुनियादारी दाखवण्याचे फायद्याचे गणित नक्कीच मांडले असते . सिनेमाची एक आणि एकमेव उत्तम बाब म्हणजे सिनेफोटोग्राफी . . ज्यांनी दक्षिण पाहिला नाही त्यांना मोहात पाडणारे  आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांना पुनश्च प्रेमात पाडणारे सीन यात आहेत . संगीत यथा तथा . अभिनय  'यालाच  अभिनय म्हणतात माइंड इट ' या पठडीतला . . दिग्दर्शन आपल्या आणि दिग्दर्शकाच्या सवईचे . . त्यामुळे एसी हॉल मध्ये, मऊ खुर्च्यांवर बसून बचकं  भर पॉपकॉर्न पोतभर पैसे ओतून खायचे असतील तरच (डोकेदुखी थांबण्याची गोळी घेऊन ) चेन्नई एक्सप्रेस मध्ये बसावे . . . नाहीतर चेन्नई एक्सप्रेस सुटलेलीच बरी !! 

चित्रपट - चेन्नई एक्सप्रेस
कलाकार - शाहरुख खान , दीपिका पदुकोण , सत्यराज 
दिग्दर्शक -रोहित शेट्टी 
निर्माता - गौरी खान 
              रॉनी स्क्रूवाला 
              सिद्धार्थ रॉय कपूर 
संगीत -विशाल शेखर 


टाळ्या शिट्ट्या फेटे - २  / ५ 


(खुलासा - तमाम उडपी हॉटेल चालवणाऱ्या शेट्टी लोकांबद्दल मला आदर आहे . अनेकदा मी त्यांच्या हॉटेलात जाऊन त्यांच्या इडली सांबर चा आस्वाद घेतो . केवळ विषयाची गरज आणि आडनावाचे सार्धम्य यामुळे उल्लेख केला आहे .हॉटेल वाले  शेट्टी त्यांच्या खाद्य पदार्थात चुकीचे पदार्थ वापरतात असे माझे म्हणणे नाही . कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी )

Thursday 8 August 2013

शहीद होण्यासाठीपण नशीब लागते

शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 
भारतीय सैन्यात दाखल व्हावे लागते 
मिसरूडफुटलेले असो वा केस पांढरे झाले असो 
आयुष्यभर 'जवान ' म्हणून मिरवावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

सीमेवरची तार डोळ्यात प्राण आणून रक्षावी लागते 
प्राण जात असताना घरच्या तारेकडे प्राण जाईपर्यंत पहावे लागते  
कोण बाहेरचे अन कोण आतले 
दोहोसह सतत झुंजावे  लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

उगवतो एक दिवस, एक रात्र मावळते 
उलटतात आठवडे अन सरतात वर्षे 
काळावर एकदिवस काळच घाला घालतो 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते  

ज्या तिरंग्यासाठी केला अट्टाहास 
ज्याच्या सन्मानासाठी दिले आपले प्राण 
तोच तिरंगा अंगाभोवती लपेटल्यावर काय सुख मिळते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

कारण नसताना होते ते राजकारण 
कारण असताना होते ते सत्ताकारण 
राजकारण आणि सत्ताकारण अनुभवायला
 सीमेवर जावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

गोळी घुसेल बॉम्ब फुटेल 
शिरहीन देह भडाग्नित जळेल 
अक्रोशांच्या फैरी आणि अश्रूंची सलामी मिळेल 
हे बघून क्रियाकर्म करणाऱ्या पोराला वाटेल 
मला पोरका करून बा कायतर करून गेला 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

तिरंग्याच्या भगव्यात दिसतो बाचा पटका 
हिरव्यात दिसते गावचे शेत अन हिरवा चुडा 
चक्रात दिसतं मायचा तवा अन भाकर खरडा 
पांढऱ्यात दिसते माझ्या बायकोचे कपाळ 
हे सगळे काही क्षणात अनुभवायला मरावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

मोर्चे निघण्यास सभा भरण्यास 
कमानी उभारण्यास अन पुरस्कार मिळण्यास 
दहनाचा सोहळा 'लाइव ' होण्यास 
सीमेवर जावे लागते 
लढता लढता मरावे लागते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते 

कितीदिवस मरायचे अन सोसायचे ?
वळणाऱ्या मुठी अन स्फुरणारे बाहू किती दिवस रोखायचे ?
समोर दिसणाऱ्या शत्रूला कितीदिवस मोकाट सोडायचे 
सोडलेल्या शत्रूकडून किती दिवस 'चकमकीत ' मरायचे ?
अहिंसा मानणाऱ्या देशाचे हेच तर दुखणे  असते 
शहीद होण्यासाठीपण नशीब लागते  

मी वर जाईपर्यंत अजून दोन चार येतील 
ते येईपरेंत अक्खी रेजिमेंट येईल 
वरच भरेल मग शहिदांचा मेळा
जो एकमुखाने गरजेल 
आता तरी कबुतरे उडवायचे थांबवा 
कमी जवानांची नाही तर 
धोरणांची आहे 
भीती मरणाची नाही तर
 मेल्यानंतरच्या राजकारणाची आहे 
एकदिवस शहिदांची रेजिमेंट करेल हल्ला 
सोडवेल काश्मीर अन भयमुक्त करेल तिरंगा 
तेवाच अखंड भारत बोलेल ,
''शहीद होण्यासाठीपण नशीब लागते "


पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यांत वारंवार शहीद होणाऱ्या जवानांना हतबल भारतीयाचा मानाचा मुजरा . . तुमची घरे मोडतात म्हणून आमची उभी राहतात . . तुमच्या घरी चुडे फुटतात म्हणून आमच्या घरी येतात . त्यागाने सुरु होणारे आणि शहीद होऊन संपणारे तुमचे आयुष्य म्हणजे दुराभिमान आणि अभिमान यात सुरु असलेले अखंड युद्ध . कदाचित कधीच न संपणारे . . . सार्थ अभिमान आहे मला तुमचा आणि सीमेवर अखंड पाहरा देणाऱ्या जवानांचा . . तुमचे बलिदान कधीच व्यर्थ जाणार नाही , तुमच्या यशोगाथा केवळ एखादी कमान ,चक्र किंवा समाधीपुरती मर्यादित राहणार नाही . .जात -धर्म विसरून  ती प्रत्येक राष्ट्रप्रेमी भारतीयाच्या धमन्यातून त्यागाची आणि लढ्याची प्रेरणा देत वाहेल . . एकदिवस तुमचे आमचे देशाचे स्वप्न साकार करेल तेव्हा आपण अभिमानाने म्हणू ' व्यर्थ न गेले बलिदान ' 

अंकुर