Saturday 30 November 2013

तरुणांचा आदर्श कोण ??

वलयांकित क्षेत्र हे बहुदा कलंकीत 'च ' असते असे सर्वसामन्यांचे ठाम मत असते . त्यामुळे अशा क्षेत्रात आपली मुले -मुली स्वहस्ते पाठवायला तो अजूनही बिचकतो . . या वलयांकित क्षेत्राला आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा सर्वतोपरी प्रयत्न करतो . . हा द्वेष बोलण्यातून सुद्धा जाणवतो . आमची ती संस्कृती त्यांचे 'कल्चर ' . आमची 'जीवनशैली ' आणि त्यांची 'लाईफ स्टाईल ' . आमची 'मुल्ये ' आणि त्यांचे 'मॉरल्स ' . इत्यादी . या वलयांकित क्षेत्रातील लोकांनाही खाजगी सुसंकृत आयुष्य असते असे मानायला पापभिरू कुटुंबे तयार नसतात . . या क्षेत्रात वर जाताना पैशा सोबत बरेच काही द्यायला लागते असा सार्वत्रिक गैरसमज असतो . सिनेमा अन बातम्या यामुळे तो अधिक बळकट होतो . या बरेच काही ला अनेक पर्याय आहेत . कुछ पाने के लिये कुछ 'खोना ' पडता है . इस हाथ से ले उस हाथ से 'दे ' . अजून बरेच काही . या सर्व शब्दांचा लसावी काय तर काहीतरी कमवत असताना काहीतरी '  गमवावे ' लागते . इथे काहीतरी गमावणारी 'स्त्री ' असेल तर तिचे काहीतरी गमावणे सामाजिक चिंतेचा अन चिंतनाचा विषय होतो . जेव्हा काहीतरी गमावलेली स्त्री जाहीरपणे म्हणते , ' आपण केवळ एकनिष्ठता अन आपल्या शरीरावर आपलाच अधिकार आहे हे दाखवून देण्यासाठी लढत आहोत .' तेव्हा पत्रकारीतेसारख्या वलयांकित क्षेत्रामध्ये सतत प्रकाशझोतात वावरणाऱ्या , नैतिकतेचा अन सामाजिक मुल्यांचा झेंडा आपल्याच खांद्यावर आहे या अविर्भावात वावरणाऱ्या , त्या 'क्षेत्रात ' येऊ पाहणाऱ्या काही शे मुला मुलींच्या 'आदर्श ' असलेल्या व्यक्तींची कलंकित मानसिकता देशासमोर येते अन प्रश्न उभा राहतो  तरुणांचा आदर्श कोण ??

Saturday 23 November 2013

नामांतर - एक वाद . . एक संधी !

'नावात काय आहे ? ' असा सवाल निर्माण करून थोर नाटककार शेक्सपिअर सोळाव्या शतकात निवर्तला . तोच जर विसाव्या शतकात अन त्यातल्या त्यात भारतात जन्माला आला असता अन नावात काय आहे ? असे काहीबाही बोलता झाला असता , तर निश्चित 'प्रतिगामी ' ठरवला गेला असता . चौका चौकात त्याच्या नावाने शिमगा झाला असता , त्याचेच साहित्य जाळून त्या भोवती सुधारणावादी पुरोगामी कार्यकर्त्यांनी फेर धरला असता , शाई आणि डांबराच्या रंगात तो न्हावून निघाला असता . तो तिकडेच महान म्हणून (होऊन ) गेला ते बरे झाले . . भारतापुरता विचार करावयाचा झाला तर नावात काय नसते ?? नावात वर्ण ,वर्ग , वलय , वर्चस्व , जात ,धर्म  , राग ,द्वेष , अनुनय ,असूये पासून अस्मिते पर्यंत सर्वकाही असते . म्हणूनच भारतीय 'नावावर ' चालतो , विकतो अन खपतो सुद्धा . . याच नावाला एकदा आडनाव चिटकले की आडमार्गाने वेगळेच राजकारण सुरु होते . आमचे अन तुमचे या भांडणात ते 'आपलेच ' आहेत हा विस्तृत दृष्टीकोन संकुचित होतो . अमुक एक नावा आडनावाची व्यक्ती म्हणजे तमुक जातीची /धर्माची अस्मिता . . इतरांना त्यावर बोलायचा किंवा तात्विक विरोध करायचा अधिकार नाही . . कारण . . कार्याला अडगळीत टाकून केवळ नावाचे भांडवल करणे , अस्मितेचा मुद्दा बनवून समाजाला एकमेकात झुंजवणे , व्यक्तीची प्रतीके बनवून त्यांचे अमर्याद कार्य ठराविक जाती धर्माच्या 'मर्यादित ' चौकटीत बंदिस्त करणे अन त्या बंदिस्त चौकटीचा एकमेव रखवालदार , वारसदार म्हणून बहुसंखेने समाजात वावरणे किंबहुना समाजात आपल्यासारख्याच संकुचित विचारसरणीच्या लोकांचा समूह तयार करून सामाजिक स्वास्थ्य बिघडवणे हेच या शतकाचे ' नामी ' राजकारण आहे . . . .

Monday 18 November 2013

'नकळत दिसले सारे . . . '


ती एक प्रशांत सायंकाळ होती . घड्याळात किती वाजले होते आठवत नाही . कारण डोळे निकामी झाले होते . कान दुप्पट वेगाने कार्यरत झाले होते .. समोरून कोणीतरी येतंय , बाजूने कोणीतरी सरकतंय , मागून कोणीतरी ढकलतय , पुढून कोणीतरी ओरडतय हे सारे जाणवत होते पण दिसत नवते . . . मी अंधळा झालो होतो का ?? डोळ्यासमोर केवळ अंधार . . ओळखीचा रंग एकच . . सोबतीचा रंग एकच . . ज्ञात असलेला रंग एकच . . 'काळा ' . . कधीपासून होतंय मला असे ?? समोरचे दिसूनही दिसत नाही , असूनही जाणवत नाही , बघूनही बघवत नाही . . . का ?? माझी दृष्टी गेली होती का डोळसपणा हरपला होता ? मी माझ्या आयुष्याकडे शेवटी कधी 'डोळसपणे ' डोकावून पहिले होते ? माझे आजपर्यंतचे आयुष्य कधी 'डोळ्याखालून ' घातले होते ? मला सुंदर डोळे दिल्या बद्दल मी ईश्वराचे कधी आभार मानले होते ? ज्यांना डोळे नाहीत त्यांना मी कधी मदत केली होती ? डोळे मिटण्या पूर्वी जर डोळेच काम करेनासे झाले तर आयुष्य कसे असेल याचा मी कधी विचार केला होता ? या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचे उत्तर म्हणजे भावनांना हात घालून सामाजिक कर्तव्याची जाणीव करून देणारे नाटक ' नकळत सारे दिसले . . . '

Friday 15 November 2013

तें . . .

समस्त महाराष्ट्राने ' तें ' वर मनापासून प्रेम केलं . त्यांना आपलंसं मानलं . 'तें ' च्या वेगळेपणाला स्वीकारलं . कारण 'तें ' म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे . तर ती एक मानसिकता आहे . एक जीवनशैली आहे . प्रस्थापित शक्ती , समजुती , भाकडकथा यांना हादरवून टाकणारी ताकद आहे . इतिहासात न रमता इतिहास निर्माण करण्याची जिद्द आहे . वर्तमानाला न चुचकारता भविष्याला आव्हान देण्याची धमक आहे . समाजात वावरताना सामाजिक नैराश्या विरोधात केलेला विद्रोह आहे . मोठ्ठ होत असताना मोठेपणातील फोलपणा ओळखून जमिनीशी नातं टिकवून धरण्याचा मोठेपणा आहे . वैयक्तिक आयुष्यातील दुक्खे मागे सारून समाजाला , देशाला पुढे नेण्याचे नेतृत्व आहे . मागाहून येणाऱ्या अनेक पिढ्यांवर गारुड राहावं अस कर्तुत्व आहे . उंचीवर जाऊन देखील खोलीतला खोलपणा जाणण्यातलं अन मानण्यातलं तत्व आहे . पराकोटीचे प्रेम अन टोकाचा विरोध एकाचवेळी मिरवण्याचे निष्काम कर्मयोग्याचे 'तें ' चे जीवन आहे . . . . 'तें ' . . मग ते विजय असो वा सचिन . . . क्षेत्र भिन्न पण कार्य एकच . साधने वेगळी पण साधना एकच . . . दिशा वेगळ्या पण अंतिम क्षितीज एकच . . फटकारे वेगळे पण भिरकावणे एकच . . . व्यक्ती वेगळ्या पण आत्मा एकच . . महतीचे पोवाडे अनेक पण महानता स्पष्ट करण्यास पुरेसा शब्द एकच . . ' तें ' . . . !!
                                या दोन्ही तेंडुलकरांनी जोरदार अन जोमदार कलात्मक फलंदाजी केली . . . यांनी रचलेला प्रत्येक शब्द आणि मारलेला प्रत्येक फटका येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी आदर्श ठरला . बागुलबुवा करून महत्व दिलेल्या गोष्टीना सीमापार भिरकावून द्यायची शक्ती यांनी दिली . यांची अदाकारी म्हणजे समोरच्याला कोड्यात टाकणारी , कोडे सोडवच म्हणून मजबूर करणारी , कमाल स्वगत घडवून आणणारी अन अंती कमालीचा आनंद देणारी . मला तेंडूलकर समजले असा कोणीही सखाराम गटणे म्हणण्याचे धाडस करणार नाही अन मला तेंडूलकरचे तंत्र समजले असे निवृत्ती नंतरही म्हणायचे धाडस कोणी गोलंदाज करणार नाही . . या दोनीही ' तें ' नी गूढता जपली . सूर्यप्रकाशात सर्व गोष्टी सुर्यप्रकाशासारख्या स्वच्छ दाखवूनही बरेच काही आकलनासाठी शिल्लक ठेवले . आपली ओळख निर्माण करत असताना आपल्या क्षेत्राला सुद्धा मोठे केले . . या दोन्ही तेंडुलकरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते 'माणूस ' म्हणून प्रचंड मोठे अन समृद्ध झाले . आपापल्या क्षेत्रात चिरफाड करत असताना , वैयक्तिक आयुष्यात मात्र एक सभ्यता आणि पावित्र्य जपले .  विजय तेंडूलकर मलाही आताशी जरा कोठे समजायला लागले आहेत . सचिन बऱ्यापैकी समजला आहे . आजचा दिवस आणि येणारे काही दिवस सचिनचे असल्याने त्यावर थोडे अधिक भाष्य करतो . . 
                                 
भारतीय क्रिकेट मध्ये आपण चेंडू पर्यंत जायचे नाही तर चेंडूला आपल्या पर्यंत येऊ द्यायचे असा प्रघात असल्याचे काही मुलाखतीतून मला समजले . गोलंदाजाला अवास्तव महत्व देण्याचा हा प्रकार होता . 'पुढे सरसावून आघात ' करायची वेस्ट इंडिअन खुनशी मानसिकता आपण दूरच ठेवली होती . त्याचमुळे विशीच्या आतल्या एका पोराने अब्दुल कादिर ला पुढे सरसावून खणखणीत चार षटकार मारले तेव्हा भारतीय क्रिकेटची मानसिकता बदलत असल्याचे अनेकांना जाणवले . भारत परदेशात जिंकू शकत नाही हा इतिहास कोठेतरी बदलायला लागला . गोळी सारख्या तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूला हतबलतेने पाहणारे गोरे सर्रास दिसू लागले . सुनील गावस्कर वगिरे यांनी याचा शुभारंभ केला होताच पण दूरदर्शन बाळबोध अवस्थेत असल्याने त्याचे दर्शन म्हणावे तितके झाले नाही . सचिन आल्यावर त्याने गोलंदाजांची जी कत्तल सुरु केली ती घरोघरी पोहोचली . आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला एक वेगळाच अनुभव देतोय याचा आनंद देशभर पसरायला लागला . प्रस्थापीत , नावाजलेली , दहशतनिर्माण केलेली ओस्त्रेलिया , पाकिस्तान , विंडीज यांची गोलंदाजी बेदरकारपणे फोडून काढता येते याचे प्रात्यक्षिक सचिन च्या रुपात पहायला मिळाले . अर्थात त्याच्या सहकार्यांनी सुद्धा गिअर चेंज केल्याने भारतीय क्रिकेट अन भारतीय प्रेक्षक यांची मानसिकता एकाच वेळी बदलायला लागली . सत्तांतराची  सुरुवात झाली . . याचा शिलेदार म्हणजे 'तें ' डूलकर . . . 
                         
   गेली पंचवीस वर्षे सचिन खेळत आहे . रोज काहीतरी शिकत आहे . कोणालातरी प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे शिकवत आहे . मोठेपणासोबत येणारी प्रसिद्धी आपल्या सहजतेवर मात करणार नाही याची दक्षता घेत 'तें ' प्रमाणे वाटचाल करत आहे . असामान्य गुणवत्तेला शालिनतेची जोड देऊन सभ्यतेचे नवे पायंडे पाडत आहे . विजय तेंडूलकर गेल्यावर साहित्य विश्वात जी पोकळी निर्माण झाली तीच पोकळी सचिन निवृत्त झाल्यावर क्रिकेट विश्वात निर्माण होणार आहे . कारण सचिन सोबत  'तें ' ची मानसिकता असलेल्या  , संस्कार असलेल्या  , जीवनशैली असलेल्या अनेक पिढ्या एकाच वेळी निवृत्त होतील . . अनुकरण करणारे अनेक 'तें ' जन्माला येतील किंवा घातले जातील . काही काळाने त्यांचाही उबग येउन मूळ 'तें ' ची गरज , साधना , आराधना पुन्हा एकदा अधोरेखित होईल . कारण तो , ती , ते अनेक जन्माला येतात पण 'तें ' . . . . . ?? क्वचितच जन्माला येतात . . .  जन्माला आल्याचे सार्थक करून शांतपणे निघून जातात . . . आपल्याला अस्वस्थ करून . . !! 

Wednesday 6 November 2013

उरले केवळ चार डाव !

सचिन च्या निवृत्तीची घोषणा ऐकल्यावर मी अस्वस्थ झालो . जसा जसा तो क्षण जवळ येत आहे तसा मी बेचैन होत आहे . माझे ,आपले कोणीतरी निवृत्त होत आहे असे वाटतंय . मन जुन्या दिवसात ,जुन्या आठवणीत रामतंय . मला शाळेतले दिवस अजूनही आठवतात . 'आई निवृत्त झाल्यावर /सुट्टीवर गेल्यावर ' काय होईल ? हा निबंध मी आईकडूनच लिहून घ्यायचो . माझा आवडता खेळ /खेळाडू यावर पटकन छानसा निबंध लिहून टाकायचो . कारण त्यावेळी आई मला कळली  नवती पण क्रिकेट आणि सचिन मला समजला होता . . लहानपणापासून मला मोठे करणाऱ्या , बाबांच्या अंगावर उड्या मारायला लावणाऱ्या , बहिणींशी पैजा लावायला लावणाऱ्या , अरे किती दंगा करतोस म्हणून आईचा मार खायला लावणाऱ्या सचिनच्या निवृत्तीला उरले केवळ चार डाव  . . . ! 

Tuesday 5 November 2013

मातीचा किल्ला : भाग तीन

अभिव्यक्ती म्हणजे काय ? अभिजात म्हणजे काय ? या दोन प्रश्नांची उत्तरे ज्यांना हवी असतील त्यांनी मातीचा किल्ला पहावा . किल्ला हे   माणसाला समृद्ध करणारे , त्याच्या निरीक्षण आणि आकलन शक्तीला वास्तवात उतरवणारे , , वास्तवाहून चार पावले पुढे जाऊन विचार करणारे ,कल्पनेला सत्यतेच्या कोंदणात बसवणारे , येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारे , खर्ची पडलेल्या अनेक पिढ्यांच्या कर्तुत्वाची गाथा सांगणारे शिल्प असते . मग तो सह्याद्रीच्या निबिड अरण्यात ,घनदाट जंगलात वर आलेल्या कातळावर घडवलेला अभेद्य गड असो किंवा परसात केलेला काही फुटी मातीचा किल्ला असो , आकार बदलला तरी भाव बदलत नाही . मातीचा किल्ला करणे म्हणजे आपलंच असं स्वराज्य निर्माण करण्याची एक प्रक्रिया असते . राजेपण जरी शिवाजीचे असले तरी त्यास ते मिळवण्यास सहाय्य कण्याची एक समृद्ध धडपड असते . हि धडपड गेली साडे तीनशे चारशे वर्ष अखंड सुरु आहे . सह्याद्रीच्या कातळात आणि शहराच्या सिमेंटात अजूनही शिवरायांचे स्मरण होते . . पूजा होते . . साधना होते . .  राजेंनी पुन्हा जन्म घ्यावा म्हणून प्रार्थना होते . ही 'परंपरा ' अनेक पिढ्यांपासून सुरु आहे . याच परंपरेतला एक अविभाज्य भाग म्हणजे दिवाळीत घडवला जाणारा 'मातीचा किल्ला ' . . .

Sunday 3 November 2013

दिवाळी "ती " आणि "ही".....


दिवाळी म्हणजे अंधकार भेदून जाणारा प्रकाशाचा सण...मग तो आसमंत मधील असो वा मना मधील .."तमसो मा जोतीर्गामय" हि उक्ती सार्थ ठरवणारा हिंदू धर्म मधील महत्वाचा आणि मानाचा सण....धन्वंतरी पूजन,लक्ष्मिपुजन,पाडवा,भाऊबीज अशा सणांनी नटलेले आणि मंतरलेले दिवस....किल्ला ,फटाके ,गोड धोड (मनापासून आणि वजन वाढीचा विचार न करता खाणे ) आताशी होत नसले तरी दिवाळीचा आनंद मात्र तसूभरही कमी होत नाही ......चकली खात असताना सहज डोक्यात विचार आला कि मागच्या वर्षी असेच बागेत बसून चकली वर ताव मारत होतो यंदाही मारत आहे मग या १क वर्षात बदल तो काय झाला ? ? आणि मग विचारांची चक्रे फटाक्याच्या चक्रा  सारखी गोल गोल फिरू लागली ...

Friday 1 November 2013

मातीचा किल्ला : भाग दोन

माणूस सदनातून सदनिकेत रहायला गेल्यापासून सहजीवनातील मजा मर्यादित झाली आहे . चाळ किंवा वाडा हे जरी सदनिकेचे प्रकार असले तरी त्यांच्या वास्तूत सहजीवन कोठेतरी खोलवर मुरलेले , रुजलेले  होते . एखाद्या खोलीतील जन्माचा आनंद  आणि एखाद्या खोलीतील मरणाचे सुतक संपूर्ण चाळ साजरे करत होती ,पाळत होती . प्रत्येक घर दुसऱ्या घराचा पार्ट होता . . सदनिकेच्या उंच्या जशा वाढत गेल्या तशा घराच्या लांब्या आणि मनाच्या खोल्या आकसत गेल्या . किलबीलणारे अंगण , कुजबुजणारे स्वयंपाकघर ,समृद्ध परसबाग हे प्रकार नामशेष झाले . माती परकी आणि पोरकी झाली . जागेच्या आणि वेळेच्या युद्धात कुटुंबाचा विस्तार सुकत गेला . .पीओपी चा किल्ला त्याच सुकलेल्या कुटुंबात , हरवलेल्या बालपणात , मोठ्यांच्या 'आमच्या वेळी असं नवतं ' या स्वगतात , सोसायटीच्या 'बरं झालं . . चिखल आणि स्वच्छता वाचली ' या स्वार्थात कुठेतरी 'कल्पतरू ' सारखा वावरत आहे ... . हा काळाने स्वीकारलेला बदल आहे . हा बदललेल्या संस्कृतीचा चेहेरा आहे . तो आपल्याला स्वीकारायलाच हवा . . . .