६ फुट २ इंच अशी उंची ,धिप्पाड शरीरयष्टी ,गोलंदाजाने टाकलेल्या सुरेख चेंडूची पण चिरफाड करण्याची क्षमता ,सामना एकहाती फिरवण्याचे कौशल्य ,वेळप्रसंगी गोलंदाजी करायचेही कसब आणि याच गुणांनी वेस्ट इंडीज च्या महान खेळाडूत बसण्यास लारा नंतरचा योग्य खेळाडू ख्रिस गेल आणि कधीकाळी सर्वोत्तम मधील सर्वोत्तम खेळाडू दिलेली ,जगावर एकहाती अधिराज्य गाजवलेली ,क्रिकेट च्या इतिहासातील जवळपास सर्व विक्रम प्रथम नोंदवलेली पण सध्या अनागोंदी कारभार ,आर्थिक चणचण, गुणवान खेळाडू असूनही अपुरे मार्गदर्शन ,मोठ्या स्पर्धात केवळ सहभाग यामुळे डबघाईला आलेली वेस्ट इंडिअन क्रिकेट समिती यांच्यात "मोडेन पण वाकणार नाही " अशा तऱ्हेने मानापमानाचा खेळ चालू असल्याने एका गौरवशाली ,प्रतिभाशाली ,नैसर्गिक खेळाडूवर अकाली संन्यास घ्यायची वेळ येणार काय अशी चिंता आणि कधी काळी जग जिंकलेल्या संघाचा "नामिबिया " होणार काय असा प्रश्न प्रत्येक क्रिकेट प्रेमीस पडलेला आहे .....

११ /१०/१९९९ रोजी जेवा जमैकन फलंदाज ख्रिस गेल याचे अंतराष्ट्रीय क्रिकेट मध्ये पदार्पण झाले तेवा सर्व माजी खेळाडूंचा अंश घेऊन मैदानावर उतरला आहे याचा सर्वांनाच भास झाला ! धिप्पाड अंगकाठी ,भेदक नजर ,चेंडू तटवायचा पण असतो याचा पडलेला विसर , सीमारेषेशी असलेले प्रेम ,फटक्या मागची ताकद आणि क्षेत्र रक्षकाच्या मधून चेंडू काढायची नजाकत हे सर्व गुण असलेला खेळाडू संघास पुन्हा सुवर्णयुग दाखवेल अशी अशा निर्माण झाली...आणि तो वागलाही तसाच....धावांचा पाऊस म्हणजे काय असतो ,षटकार कसा आणि किती दूर मारायचा असतो ,रांगडेपणा काय असतो याचे जगाला दिलेले दर्शन विस्मयकारक होते ...कसोटीमध्ये १३ शतक ,३३ अर्धशतक ,९३६ चौकारांचा पाऊस पडत केलेल्या ६३७३ धावा आणि एकदिवसीय क्रिकेट मध्ये १९ शतके ,४३ अर्धशतके ,१६९ षटकार ठोकून ८०८७ धावा करणारा फलंदाज शेवटचा कसोटी सामना १/०५/२०१० रोजी आणि शेवटचा एकदिवसीय सामना २३/०३/२०११ रोजी खेळला होता हे पाहून मनास यातना होतात ....स्फोटक फलंदाजांचे नंदनवन म्हंटल्या जाणाऱ्या २०-२० स्पर्धेतील त्याची कामगिरी थक्क करायला लावते ..आई.पी .एल ४ मध्ये १२ सामन्यात १८३.१ च्या strike rate ने ४४ चौकार ,५६ षटकारांसहकुटलेल्या ६०८ धावा आणि बिग बाश,बांगलादेशातील स्पर्धेत आणलेली सुनामी पाहून एक प्रश्न पडतो कि तो नक्की चेंडूस बदडत होता का वेस्ट इंडिअन नियामक मंडळास ....अशी अप्रतिम करणाऱ्या फलंदाजाचा घात त्याच्या धडाकेबाज स्वभावानेच झाला...
कोण्या एका रेडीओ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये काही वादग्रस्त विधाने करून हीट विकेट पाडून घेतली ...मुळात स्वभावाच चौकार षटकार मारायचा असल्याने नमते घ्यायचा प्रश्नच येत नाही....आडमुठ्या स्वभावाच्या मंडळाने हे प्रकरण ताणल्याने गेली २ वर्षे हा खेळाडू मैदानाबाहेर बसला आहे ...नियामक मंडळाने तर माज कोणत्या कोणत्या खेळाडूंच्या जीवावर करावा ...चंदरपॉल आणि सरवान निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभे आहेत ,पोलार्ड आणि ब्रावो स्वताला अजून दीर्घकालीन सेवा करण्यासाठी सिद्ध करू शकले नाही आहेत आणि इतर खेळाडूंची नावेही बऱ्याच लोकांना माहित नाहीत...संघ जेवा अडचणीत असेल .त्यातून बाहेर पडायचा मार्ग असेल अशावेळी राजाला मागे ठेऊन प्यादयांच्या सहाय्याने खेळत बसायचे यात कोणता शहाणपणा ? संघ महत्वाचा का आपला अहंकार याचा निर्णय दोघांनीही घ्यायला हवा ....काही क्रिकेट प्रेमी असे असतात कि ज्यांचे खेळावर प्रेम असते ...सामना कोणत्याही देशाचा असो त्यांना फ़क़्त सर्वोत्तम खेळाडूचा सर्वोत्तम खेळ पहायचा असतो...तो खेळाडू बाद झाला कि सामन्याचे पुढे काय होते यात फारसा रस नसतो....अशा सर्व प्रेमींची हीच भूमिका असणार कि "मोडेन पण वाकणार नाही " अशा आडमुठ्या भूमिकेमुळे केवळ ३२ वर्षाच्या प्रतिभावान खेळाडूच्या गौरवशाली कारकीर्दीचा क्लीन बोल्ड होऊ नये .....
No comments:
Post a Comment