सिनेसृष्टी मधील काही कलाकार त्यांच्या खास शब्दांमुळे तर काही शब्द कलाकारांमुळे प्रसिद्ध झाले . शब्द आणि कलाकारांच्या दृढ नात्यावर रसिकांनी जितके मनापासून प्रेम केले तितकेच आपल्या पद्धतीने त्याचे अनुकरण करण्याचे प्रयत्नही . अजित ची मोना डार्लिंग ,राज कुमार चा जानी , शत्रुघ्न चा खामोश , धर्मेंद्र चा कुत्ते कमीने , अमरीश पुरी चा मोगॅम्बो , महेश कोठारे चा damn it इत्यादी शब्द त्या कलाकारांची ओळख बनले . सध्या मराठी मालिका विश्वातही तेच होत आहे . शब्दांची किमया ,सादरीकरणातील प्रभुत्व आणि भूमिकेने कलाकारांभोवती निर्माण केलेले वलय यामुळे मालिका ठराविक कलाकारांमुळे आणि त्यांच्या शब्दांमुळे ओळखल्या जाऊ लागल्या आहेत . अक्कासाहेबांचा कळलं असो वा सर्जेराव विखे पाटील यांचा किडक रताळ किंवा आमचा सबुद म्हणजे एक घाव शंभर तुकडे असो . रमेचा स्वतः असो वा माऊचा ए लिसन असो . संग्राम चा तुमच्यासाठी कायपण आणि सत्यजितची भुवई वक्र करून बोलायची स्टाईल तर तरुणाईत इन आहे . बाहेर पडल्यावर अनेकदा कोणाच्या तरी तोंडात किंवा कोणाच्या गाडी मागे यातील काही शब्द हमखास सापडतात .दिवाळीत संग्राम कुर्ते , देवयानी साडी ,अक्कासाहेब मंगळसूत्र , रमेची नथ याला मागणी वाढते आणि जाणीव होते मालिकेच्या आपल्या आयुष्यातील स्थानाची , प्रेक्षक आणि मालिका यांच्या नात्याची आणि मराठी मालिकांना अजूनही प्रेक्षकवर्ग आहे या सुखद सत्याची !!
.jpg)
मराठी मालीकांसोबत मराठी प्रेक्षक पुढे जात असताना शिक्षांचा नवा प्रवाह पडत आहे . कोणतीही चूक झाली , कोणीही केली तरी शिक्षा ही ठरलेली . प्रत्येकवेळी परिस्थितीला साजेशी शिक्षा शोधून काढणे आणि ती प्रेक्षकांना पटणे हे खरच कौशल्याचे काम आहे . आमच्या घरी केवळ माझाच न्याय चालतो या थाटात केलेल्या शिक्षा मनोरंजन वाढवत असल्या तरी यातून काही चुकीचा संदेश जात नाही न ? याचीही काळजी घेणे महत्वाचे आहे ... " माझे लग्न झाले तेव्हा काही चूक झाली तर सासू शाब्दिक शिक्षा बऱ्याच द्यायची . खूप सोसले ...पण आता काळ बदलला आहे , स्त्रियांचे महत्व काही अंशी लोकांना पटू लागले आहे . त्यामुळे अंतर्गत कुरबुरी चालू असल्या तरी शिक्षा आता नाहीश्या झाल्या आहेत आणि ते चांगलेच आहे .. किती काळ महिलांनी सोसायचे ?? टीव्ही वर बघून आता कोणी शिक्षा करेल आणि सून सहन करेल अशी परिस्थिती नाही .... " सत्तरीच्या घरातील आजीबाई ठसक्यात सांगतात . दामिनी , महाश्वेता , थरार , आमची माती आमची माणसे , सपट परिवार महाचर्चा यासारख्या दर्जेदार मालिका पुरवल्या नंतर आता सह्याद्री थोडेसे मागे पडले आहे . इतर वाहिन्यांची आणि मालिकांची मुबलक संख्या , केबल चे कमी झालेले दर यामुळे प्रेक्षक सह्याद्रीपासून काहीसा दुरावला आहे .असे असले तरी सात च्या बातम्यांचे आकर्षण अजूनही कायम आहे .जेष्ठ लोक सह्याद्रीची आजही आठवण काढतात . आता "रेकॉर्ड " ची सुविधा उपलब्ध असल्याने हातातली कामे पटापट आटपून किंवा बाजूला सारून मालिका पाहण्यातील मजा आताच्या पिढीला कळणार नाही अशी खंतही बोलून दाखवतात . राजा शिवछत्रपती ,एका लग्नाची दुसरी गोष्ट यासारख्या मालिकांनी सतत वाढत असलेल्या टी .आर .पी . च्या मोहात न पडता योग्य वेळी मालिका बंद करून नवा पायंडा पाडला आहे . ठराविक भागापुरती मालिकेची निर्मिती हि स्तुत्य संकल्पना काही अंशी रुजत आहे.
अखेर मालिका म्हणजे काय ? आपल्या मनातील काल्पनिक कथा पडद्यावर पाहण्याचे सुख , अरे मी यातूनच गेलो आहे अशा आठवणीत रमण्याची वेळ , असे कोणाच्याही आयुष्यात घडू नये म्हणून संवेदनशील मनम लागलेली रुखरुख , निराशेने व्यापलेल्या दिवसात हास्याचा छोटासा कारंजा आणि दिवसभराच्या धावपळीतून स्वतःसाठी ,स्वतःच्या आवडीसाठी काढलेला घटकाभर वेळ . प्रत्येकाची आवड वेगळी , निवड वेगळी पहायची दृष्टी आणि वेळही निराळी . असे असतानाही एखादी मालिका आवडून जाते . आणी जुळतात ते मालिकेसोबत ,त्यातील कलाकारांसोबत भावनिक बंध , वाढते ती उत्सुकता आणि सर्व नीट होऊदेत म्हणून होणाऱ्या प्रार्थना . कोण म्हणतो टी .व्ही .ला इडीअट बॉक्स ?? हे तर आहे आमच्या मनोरंजनाचे ,आनंदाचे द्वार ....कळलं ??