Friday 1 November 2013

मातीचा किल्ला : भाग दोन

माणूस सदनातून सदनिकेत रहायला गेल्यापासून सहजीवनातील मजा मर्यादित झाली आहे . चाळ किंवा वाडा हे जरी सदनिकेचे प्रकार असले तरी त्यांच्या वास्तूत सहजीवन कोठेतरी खोलवर मुरलेले , रुजलेले  होते . एखाद्या खोलीतील जन्माचा आनंद  आणि एखाद्या खोलीतील मरणाचे सुतक संपूर्ण चाळ साजरे करत होती ,पाळत होती . प्रत्येक घर दुसऱ्या घराचा पार्ट होता . . सदनिकेच्या उंच्या जशा वाढत गेल्या तशा घराच्या लांब्या आणि मनाच्या खोल्या आकसत गेल्या . किलबीलणारे अंगण , कुजबुजणारे स्वयंपाकघर ,समृद्ध परसबाग हे प्रकार नामशेष झाले . माती परकी आणि पोरकी झाली . जागेच्या आणि वेळेच्या युद्धात कुटुंबाचा विस्तार सुकत गेला . .पीओपी चा किल्ला त्याच सुकलेल्या कुटुंबात , हरवलेल्या बालपणात , मोठ्यांच्या 'आमच्या वेळी असं नवतं ' या स्वगतात , सोसायटीच्या 'बरं झालं . . चिखल आणि स्वच्छता वाचली ' या स्वार्थात कुठेतरी 'कल्पतरू ' सारखा वावरत आहे ... . हा काळाने स्वीकारलेला बदल आहे . हा बदललेल्या संस्कृतीचा चेहेरा आहे . तो आपल्याला स्वीकारायलाच हवा . . . .

                                  सदनिकेत राहणाऱ्या लोकांचे जीवन ,जीवनशैली आणि गरजा या वेगळ्या असतात . घर जरी आपले असले तरी त्याला घरपण नसते . संस्कृतीजरी आपली असली तरी ती जपायचे स्वातंत्र्य असतेच असे नाही . घराच्या कर्त्या पुरुषालाही /स्त्रीलाही आपली इच्छा सोसायटीच्या नियमात बसते का ? ते तपासावे वे लागते . परवानगी काढावी लागते . सगळीकडेच असे असते असे माझे म्हणणे नाही पण बहुतांशी ठिकाणी असे असावे . कारण सोसायटीत. संकुलात  'किल्ला ' मी अजून पाहिला नाही . (कदाचित माझे फिरणे कमी असेल त्यामुळे असेल)  . सोसायटीत किल्ला होणार कसा ? पहिला मुद्दा म्हणजे , आताशी सोसायट्या जागा मिळेल तिथे उभ्या राहतात . 'निसर्गाच्या सानिध्यात ' म्हणत अजून सिमेंटची जंगले फोफावतात . . नदीच्या पात्रात अतिक्रमण करून काहीबाही बांधकाम होते . त्यामुळे भरलेले नदीचे पात्र आणि शेजारी साचलेले मातीचे डोंगर असे चित्र महानगरात पाहायला मिळत नाही .पोहायला आता 'स्विमिंग टेंक ' लागतो तो घरापेक्षा अधिक स्वच्छ असतो . त्यामुळे गेलो नदीत पोहायला ,येताना आणली दोन पोती वाळू सायकल वर टाकून असे होत नाही . सोसायटीत सर्वत्र 'पेविंग राज्य ' असल्याने मातीसाठी डबरा पाडायचा कोठे हा प्रश्न नरकासुरा सारखा उभा राहतो . त्यामुळे एखाद्याला किल्ला करायचा आहे असे कितीही वाटले तरी दगड ,माती या मुलभूत नैसर्गिक साधन संपत्तीच्या अनुपलब्धतेमुळे किल्ला घडवणे आणि घडवता घडवता स्वतः घडणे घडतच नाही . . . आता 'वड ' कुठे हुडकायचा म्हणून विकत आणलेल्या वडाच्या काडीला दोरा गुंडाळून वटपौर्णीमा साजरी होते तसेच पीओपी च्या किल्ल्याने दिवाळी साजरी होते . . यात दोष कोणाचा ? . . . . . परिस्थितीचा . . . नियतीचा !
                         परवाच एका सदगृहस्थाशी गप्पा मारत असताना दिवाळीचा विषय निघाला . ' राहिली नाही हो मजा दिवाळीची . . . आमच्यावेळी . . . " म्हणून जी रेल्वे सुटली ती महाराष्ट्र भ्रमंती करून स्टेशनावर आली . त्यांच्यातले आणि माझ्यातले ३ पिढ्यातले अंतर त्यांची दिवाळी अन आमची दिवाळी यात अंतर पाडण्यास पुरेसे होते . अंती आमचे एका मुद्द्यावर एकमत झाले की आता दिवाळीचे 'अप्रूप ' राहिले नाही ती 'रुटीन ' झाली आहे . काही लोकांसाठी तो रुटीन मधला 'चेंज ' झाला आहे . मन मानायला तयार नवते पण 'दिवाळीतील चार दिवस पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने अमुक अमुक शहराकडे जाणारा मार्ग तमुक मार्गे वळवण्यात आला आहे ' अशा आशयाची बातमी वाचून दिल मान गया . बॉस अब मान मोडके फराळ बनानेका और खांदा मोडे पर्यंत फराळ पोह्चानेका जमाना गया . . अब सिर्फ ड्राय फ्रुट का डिब्बा ड्राय दिलसे और उसनी हसिके साथ  देनेका और किस्सा खतम करनेका . . काही वर्षापूर्वी सुका मेवा देणारे घेणारे लोक ' हाय क्लास ' समजले जायचे . आता कोणीही येतं अन हातावर डबा टेकवून जातं . . काळासोबत गोष्टी बदलल्या आहेत हे खरे . मला अजून आठवते " किल्ला करून दिल्यावर तू लाडू वळायला मदत करायची " या तत्वावर आई -बहिणी माझ्यासोबत किल्ला करायला यायच्या .. अवेळी धुळवड खेळून परत फराळ करायला लागायच्या . मोठाली दगडे उचलून , विटा रचून ,चिखल मळून दमलो की स्वयंपाक घरात लाडू खायला एक चक्कर व्हायची . चिखलाच्या हाताने रव्याचा लाडू उचलून तोंडात टाकताना रवा आणि चिखल याची जी चव लागायची आणि आनंद व्हायचा , तीच चव आणि तोच आनंद मी आजही हुडकतोय . सापडत नाही . कारण मी आता किल्ला बनवत नाही अन बनवलेले लाडू वर्षभर उपलब्ध असल्याने दिवाळीच्या लाडवाचे अप्रूप वाटत नाही . . . एकेकाळी उत्साहाने दिवाळी साजरा करणारा मी आता दिवाळखोरीत गेलो आहे . .
                        सांगलीत बापट बाल शाळे समोर मावळ्यांची दुकाने भरतात . . आजही मी त्या दुकानात आणि दुकानासमोर रमतो . आजही तसाच तानाजी ,बाजीप्रभू आहे का चेक करतो . बऱ्याच ठिकाणाहून गायब होत असलेल्या रामदासाचा पुतळा 'स्टोक ' मध्ये आहे ना ,ते घाबरत घाबरत बघतो .शिवाजी महाराज आणि आफ्जुलखान अजून 'त्याच ' स्थितीत आहेत ,का ' बाहेर पडलेला कोथळा दिसणे हे एकप्रकारे हिंसाचाराचे समर्थन आहे तसेच वध बिध दाखवणे हे धार्मिक -जातीय तेढ वाढवणारे आहे ' असल्या 'नवबुद्धिवंतांच्या ' शिरातून निघालेल्या फतव्याने इतिहास बदलून टाकला आहे , तेपण जाऊन पाहतो .  ओळीने रचून ठेवलेल्या तोफा , वाघ , कोल्हे , लहान मोठे मावळे ,हिरकणी , बुरुज इत्यादी 'हिंदवी स्वराज्याचा ' ठेवा डोळे भरून पाहतो . घरात बागेची कामे करताना मातीत हात गेला की हात शिवशिवतात , दगड उचलून टाकताना भावना उचंबळून येतात . . लगोलग एखादा किल्ला बनवूनच टाकावा असे वाटते . पण सदनात राहूनही मी सदनिकेची मानसिकता स्वीकारली आहे . केलेला किल्ला 'मेंटेन ' कोण करणार ? या चिंतेने भावना दाबून ठेवाव्या लागतात , मन मारावे लागते . . मोठे झाल्याची किंमत  मोठं झाल्यावरच मोजावी लागते . .

सर्वांना 'धनत्रयोदशीच्या ' मनपुर्वक शुभेच्छा ! 

क्रमश:

  (   मातीचा किल्ला : भाग एक --      http://spaandaan.blogspot.in/2013/10/blog-post_31.html       )

1 comment: