Thursday 31 October 2013

मातीचा किल्ला : भाग एक

यदा यदा हि धर्मस्य
ग्लानिर्भवती भारत
अभ्युत्थानम् अधर्मस्य
तदात्मानं सृजाम्यहम् !

परित्राणाय साधूनां
विनाशाय च दुष्कृताम
धर्मसंस्थापनार्थाय
सम्भवामि युगे युगे . . !!

हिन्दु धर्मात पूजनीय असलेल्या भगवत गीतेत श्री कृष्णने पुन्हा अवतार केव्हा घेईन ते स्पष्ट केले आहे . सध्या देशातील आणि देशाबाहेरील स्थिती पाहता 'अवतार ' लवकरच जन्म घेणार असे राहून राहून वाटते . . असेच काहीसे वाटत असताना विचारांच्या तंद्रीत आकाशात साचत असलेल्या ढगांकडे सपशेल दुर्लक्ष करून मी बाहेर पडलो . . आल्फ्रेड हीचकॉक हयात असते तर ' अरे हाच तो रस्ता जो मी अनेक वर्षे शोधत होतो ' म्हणून एखाद्या भयपटाची निर्मिती करून टाकली असती .दुपारच्या ४ ला चक्क अंधार , सोसाट्याचा वारा , पानांपासून ते पदरा पर्यंत हवेत उडणाऱ्या अनेक गोष्टी , हेडफोन वरून कमाल आवाजात कमालीचा ठेका असलेले गाणे ऐकत असतानाही कानाच्या पदद्यावर आदळणारा वीजा फुटल्याचा आवाज , मधूनच कडमडत जाणारे कुत्रे , कावरे बावरे होऊन झिग झेग पाळणारे मांजर , माणसांची धावपळ पक्षांची फडफड . . . हे सगळे माझ्यासाठी नाही असे समजून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पचाक पचाक पावले टाकत , कपाळावर साचलेल्या पावसाच्या थेम्बाना बेफिकीरीने उडवत ,हाफ चड्डीतले एक पोट्टे फुल एटीट्युडने समोर सरकत होते . . कदाचित कोलंबस चे गर्वगीत वाचून आले असावे . . पोट्टेच ते त्यात दखल घेण्या सारखे काय ? जो पोट्टा एका हातात अक्खा किल्ला घेऊन पुढे सरकत असेल त्याची 'दखल ' घ्यायची नाही ? मला तर कृष्णाने सुदर्शन पर्वत उचलल्याची गोष्ट आठवली . . देवा . . घेतलास अवतार अखेर तू . . दिसले रे बाबा . . तुझे पाय खड्ड्यात दिसले . . मी नमस्कार करणारच होतो . . तेवढ्यात आडोशाला माझ्या शेजारी थांबलेलं म्हातारं सवयीने खाकरलं अन मी भानावर आलो . . एक नमस्कार वाचवला जेष्ठाने . . दिवाळीत ना,  'चव बघ ' म्हणून पोटभर खायला घालतात त्याने अशी सुस्ती आणि गुंगी येते ।  असो . . सांगायचा मुद्दा असा . . त्या पोट्ट्याच्या हातातला पीओपी चा लहानसा किल्ला बघून मला माझ्या लहानपणीचा मातीचा अन शेणाचा किल्ला आठवला . . उचलता न येणारा . . वर्षभर फडताळावर ठेवता न येणारा . .

              मला लहानपणापासून किल्ला म्हणजे एकवचन आणि किल्ले म्हणजे अनेकवचन हे 'व्याकरण ' बरोबर  मानले तर एका पन्हाळा किल्ल्याला 'किल्ला पन्हाळा ' असे न म्हणता 'किल्ले पन्हाळा ' असे का म्हणतात हे समजलेच नाही .  कोणीतरी माझे अज्ञान दूर करावे . . . एका दिवाळीला एक असे अनेक किल्ले मी आजपर्यंत तयार केले . . टेहळणी बुरुज बांधले , राजमाच्या बांधल्या ,कोंढाण्यावर तानाजीला चढता यावे म्हणून सुतळीची घोरपड केली .  बाजीप्रभूंचे बलीदान दाखवायला जुने मावळे हात ,पाय ,मुंडके तोडून धारातीर्थी पाडले . . प्रसंगाचे समजावे म्हणून कोयरीत ठेवलेल्या कुंकवाचे पाणी रक्त म्हणून मावळ्यांवर शिंपडले . (कोयरीत 'दो चुटकी सिंदूर ' सुद्धा शिल्लक न ठेवल्याने आईचा मारही खाल्ला ) नारळाच्या करवंटीची विहीर करून त्यात प्लास्टिकच्या मगरी , सुसरी ,कासवं सोडली . . बाबांच्या दवाखान्यातून भरलेल्या सलाईन च्या बाटल्या आणून त्याच्या पाईप मधून कारंजे उडवले . राज्यांना गडावर जायला पायघड्या नकोत का ? म्हणून गडाच्या अनेक ठिकाणी वळणे घेणाऱ्या ( सरळ रस्ता केला तर गडाखाली एकाच वेळी एकत्र जमलेले शास्ताखान ,आफ्जुल्खन ,सिद्दी जोहर सरळ सिंहासनापर्यंत नाही का जाणार ? ) रस्त्यावर सकाळ संध्याकाळ बागेत फुललेला टपोरा गुलाब खुडून त्याच्या पाकळ्या अंथरल्या .  किल्ल्या भोवती तट खणून त्यातून कापरावर का कशावर चालणाऱ्या बोटी फिरवल्या . समुद्र वाटावा म्हणून किलोभर पांढरी रांगोळी पसरून त्यावर पावशेर निळी रांगोळी भुरभुरली .  मोहरीच्या वाट्या ओतून किल्ला हिरवागार केला . . . हे सगळे मला का करता आले ? माझ्या कल्पनाशक्तीला वाव का मिळाला ? मी पुस्तकात वाचलेला इतिहास , बालेकिल्ला म्हणजे काय , टेहळणी बुरुजाचे महत्व ,त्याचे स्थान , तोफ कोठे लावावी ,मावळे कोठे तैनात करावेत इ . बारकावे का समजले ? कारण माझा किल्ला मातीचा होता , . माझ्या कल्पनाशक्तीचे स्मारक होता . .


मातीचा किल्ला करताना एक फायदा असतो, माती मिसळायची आणि मातीत मिसळायची सवय लागते . माती आपलीशी वाटू लागते . चिखल सहन होतो . . . पीओपी च्या साचेबद्ध किल्ल्यात हे होते का ? मुळात साचा आला की बद्धता येते . साचा करण्यापुरती कल्पनाशक्ती वापरली की कल्पना आणि शक्ती साचून राहते . 'मला वाटले ' म्हणून बदलता येत नाही . बदलावे म्हटले तरी मुदलाला परवडत नाही . आयुष्यात एकदा साचा आला की संस्कार अन संस्कृती लोप पावते आणि व्यावसायिकता जन्म घेते ..ज्या गोष्टी मनातून यायला हव्यात त्या खिशातून यायला लागल्या की त्याची 'किंमत ' ठरते . अमुल्य आणि अप्रूप या शब्दांचे भाव  एकाचवेळी अदृश्य होतात. .  ' अरे पन्नास किल्ले पाठवून दे रे ' अशा सुरात 'ऑर्डर ' ऐकताना 'किल्ला ' हा शब्द ऐकल्यावर जे भव्य ,दिव्य ,राकट ,रांगडे , अजिंक्य स्वरूप डोळ्यासमोर येते ते दिसत नाही . .  तसेही 'ऑर्डर ' करून जे मागवून घेतो ते सगळेच मनाला रुचते आणि बुद्धीला पटते म्हणून कोठे घेतो ? पर्याय नसतो म्हणून समोरच्या ४ पर्यायातला त्यातल्यात्यात बरा आणि परवडेबल पर्याय (चरफडत ) स्वीकारतो . . म्हणूनच माझा पीओपी किल्ल्यांना माझ्यापुरता विरोध आहे . कोथिंबीरीच्या पेंडीच्या मुळाला मातीचे लहानसे ढेकळाला  (चुकून ) हात लागला तर 'इनफेक्षन ' होईल म्हणून हात धुणाऱ्या अन संध्याकाळी 'काळजी ' म्हणून इनजेक्श्न घेणाऱ्या पोरांनी मातीत खेळले पाहिजे . लोळले पाहिजे . संपूर्ण अंग चिखलमय झालं पाहिजे . दगड मातीचा किल्ला कसा होतो ते अनुभवले पाहिजे . 'मी बनवला ' म्हणून मिरवले पाहिजे . किल्ला तोडताना डोळ्यात अश्रू तरऴले पाहिजेत . . म्हणूनच मातीचा किल्ला मनाजवळ जातो आणि पीओपीचा किल्ला केवळ डोळ्यासमोर राहतो . . . सगळ्यात वरच्या रांगेतला डावीकडून तिसरा काय 'सोलिड ' आहे ना ? म्हणून . . . .

क्रमश:
               

No comments:

Post a Comment