Sunday, 30 September 2012

पेपर नसलेली सकाळ.....



                      सुटीचा दिवस असल्याने घेतलेली मनसोक्त झोप , आळस देत हाती घेतलेला कॉफीचा कप , रेडीओ  वर रोजच वाजणारी पण आज गुणगुणावीशी वाटणारी गाणी , कॉफीचा रिता  कप बाजूला ठेऊन पुन्हा गादीवर लोळण्याचे स्वातंत्र्य , स्वयंपाकघरात चालू असणाऱ्या स्वयंपाकाचा आज काहीतरी वेगळाच आणि हवा हवासा वाटणारा सुवास , कॉलेज च्या आठवणी ताज्या करत मोठ्याने गाणी लाऊन घासलेले दात आणि गाणी गुणगुणत केलेली अंघोळ ....प्रसन्नचित्ताने नाश्त्याचा घेत असलेला उपभोग ...या सगळ्या वातावरणात लक्ष मात्र दाराकडे असते ...मन आतुरतेने एकाची वाट पाहत असते .... सुखी मनसोक्त दिनचर्येत अस्वस्थपणाची जाणीव करून देत असते ...कोण ? कोण तो ? काल सकाळीतर भेटला होता ...मला जेव्हा झोपायला ,गाणे गुणगुणायला ,आस्वाद घेत कॉफी प्यायला , पुन्हा एकदा डुलकी काढायला , गाणी ऐकत अंघोळ करायला वेळ न्हवता तेव्हा त्याच्यासाठी मात्र " विशेष वेळ राखून " ठेवला होता ... आणि आज तो नाही ?? रोज किती गडबडीत पाहतो मी त्याला ...आज जरा निवांत वेळ आहे तर तो नाही ....तो ... आज का आला नाही ?? काय करू काय आज मी ?? येरझाऱ्या घालण्या पलीकडे मी करू तरी काय शकतो .... आज त्याने सुटी घेतली आणि माझ्या सुटीची मजा घालवली .... श्या राव ...पेपर यायला हवा होता आज ...
.
                     काल अनंताच्या मिरवणुका पहिल्या टी.व्ही . वर पण पेपर मध्ये येणारे त्या लोभस मुर्त्यांचे फोटो टी.व्ही .वर मिळतात का ?? ते फोटो कापून मला फ्रेम करायची होती ....नाही उद्या १० डझन जरी आले तरी मला वेळ आहे का ?? त्यात आज भारत -पाकिस्तान सामना .... एक चेनेल म्हणतो आज नही खेलेगा सेहवाग आणि दुसरा लगेच म्हणतो  " आज फिर बरसेगा सेहवाग का केहर " आता कोणावर विश्वास ठेवायचा ?? कट्ट्यावर जायचंय न आता अंघोळ करून ... काय बोलायचे ?? संझगिरी , सुनंदन लेले किंवा हर्ष भोगले यांचे एखादे सदर डोळ्याखालून गेलेले बरे असते ... आता या आठवड्याची माझी "फिरस्ती ' राहूनच गेली ... काय लिहितात उत्तम कांबळे ...त्यांचा लेख वाचायला मी केवळ सकाळ घेते ... रविवारी निदान ते वाचायचे म्हणून १०-१५ मिनिट तरी उसंत मिळते ...आता आज सगळी सकाळ चहा आणि नाश्ता करण्यात जाणार ...तेच न ... गिरीश कुबेरांचा आज " अन्वयार्थ " वाचायला मिळाला नही ...आता तुझे काही कामाचे नसलेले मौलिक विचार ऐकण्यात दिवस जाणार ...संडे म्हणजे शोभा डे ...अरे त्यांच्या politically incorrect ला तोड आहे का ?? नही हा .... मला तर indian express जाम आवडतो ... काहीतरी ज्ञान तर वाढते ...आणि तू गप हा ..काही times वगैरे वाचत नाहीस ...फ़क़्त pune mirror / sunday times वाचायला मिळावा म्हणून नाटके ( हास्य कारंजे ) .... साला आज "आकडे " आले नाहीत ...संध्याकाळी लोचा होणार आहे , पवार साहेब अजित दादांना काय म्हणाले ?? हे टीव्ही वाले कायपण सांगतात .. ए पक्या  जरा फोन लाव तात्यांना ....अशा अनेक प्रतिक्रिया ऐकायला मिळतात ...
                  एक पेपर .... कितीचा ?? २-५ रुपयांचा .... पण त्याचे महत्व ते किती ?? ते फ़क़्त एखादा दिवस आला नही तरच समजते ...आणि त्यात जर तो रविवारचा आला नही तर तर ते जाणवते ..अनेक मान्यवर लेखकांचे लेख आणि विचार हे रविवार पुरवणीसाठी राखून ठेवलेले असतात ... आणि वाचाकांसाठीच्या सणाच्या दिवशी पेपर नही म्हणजे काय ?? आज तर माझा दिवस पुढे सरकतच नाहीये ....रोज ८-१० पेपर वाचायची सवय असलेल्या मला आज सकाळपासून एकही ताजा पेपर मिळाला नाहीये म्हणून खूपच अस्वस्थ वाटतय ... बर बातम्या बघाव्या  म्हणून टी .व्ही . लावला तर त्यांचे काही वेगळेच किस्से चालू असतात त्यामुळे अस्वस्थपणे येरझाऱ्या घालणे याहून वेदनादायक ते काय ?एक सकाळ  ती पण पेपर विना ??? ?? अशक्य आहे ..... तुमचे काय मत ??? 

No comments:

Post a Comment